खानदेशात सोयाबीनची पेरणी २ हजार हेक्टरने घटली
जळगाव : खानदेशात यंदा सोयाबीनची पेरणी घटली आहे. परिणामी उत्पादनावरही परिणाम होईल, अशी स्थिती आहे. पेरणी वाढण्याचा अंदाज फोल ठरला आहे.
सोयाबीनची पेरणी चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, शिरपूर, शहादा या भागात अधिक केली जाते. खानदेशात एकूण ४० हजार हेक्टरवर अपेक्षित असलेली ही पेरणी यंदा सुमारे ३८ हजार हेक्टरवर झाली आहे. सुरवातीला पेरणी चांगली झाली होती. परंतु जूनमध्ये पावसाने काही दिवस ओढ दिल्याने सोयाबीनचे अंकुरण व्यवस्थित झाले नाही. यामुळे पीक मोडण्याची वेळ आली. चोपडा, यावल भागात ही समस्या अधिक होती. त्यांनतर सोयाबीनची पेरणी फार झाली नाही. त्याऐवजी कडधान्य व ज्वारीची पेरणी शेतकऱ्यांनी केली.
यंदा खानदेशात सुमारे ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी अपेक्षित होती. कारण कापूस पिकात बोंड अळीने फटका बसला. परिणामी कापसाऐवजी सोयाबीनची पेरणी होईल, असे संकेत होते. सोयाबीनचे दरही स्थिर होते. सुरवातीला चांगली पेरणी झाली, परंतु नंतर सोयाबीन मोडावे लागल्याने क्षेत्र कमी झाल्याची माहिती आहे. महाबीजने जळगाव जिल्ह्यासाठी १२ हजार हेक्टरवर सोयाबीन बिजोत्पादनाची तयारी केली होती. परंतु सुरवातीला पेरणीलायक पाऊस आला नाही. जळगाव जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात सुमारे एक हजार हेक्टरने घट झाल्याची माहिती आहे.
सोयाबीनचे पेरणी क्षेत्र कमी असले तरी काही भागातील पीक मात्र जोमात आहे. पिकातील तूट काही ठिकाणी किरकोळही नाही. त्यामुळे उत्पादनात फारशी घट येणार नाही, असाही अंदाज आहे..