नगर जिल्ह्यात चांगला पाणीसाठा झाला आहे.
नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सर्व तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात सप्टेंबरअखेरपर्यंत १३९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या नऊपैकी भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा, मांडओहोळ, घोड, खैरी, सीना या आठ धरणांत शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. याशिवाय जायकवाडी प्रकल्पही शंभर टक्के भरल्याने मराठवाड्यास पाणी देण्याची चिंता मिटली आहे. मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे रब्बीसह उन्हाळी हंगामाला फायदा होईल, आशा आहे.
बागायती आणि उसाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्याने गेल्या पाच- सहा वर्षांत गंभीर दुष्काळ सोसला आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने काहीसा आधार दिला होता. यंदा आतापर्यंत चांगला पाऊस झाला. सर्व तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या चाळीस टक्के पाऊस जास्त झाला आहे. मात्र गेल्या वर्षी आणि यंदाही खरीप पिके केवळ उशिरा पाऊस झाल्याने वाया गेली.
मागील दोन वर्षांचा विचार करता यंदा धरणात मुबलक पाणीसाठी झाला आहे. मागील काळात मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी जायकवाडीत पाणी सोडावे लागले. आता जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने ती स्थिती यंदा येणार नाही. मात्र उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे नियोजन होणे गरजेचे आहे. खरीप गेला असला तरी रब्बीला सुरवात झाली आहे.
मोठ्या प्रकल्पांसोबत दुष्काळी असलेल्या पारनेर, जामखेड, पाथर्डी, नगर, कोपरगाव भागातील बंधारे, गावतलाव, पाझर तलावही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. जलयुक्त शिवारमधून झालेल्या कामामुळेही बऱ्याच भागात पाणी साठा झालेला आहे. दुष्काळाची होरपळ सोसलेल्या तालुक्यात यंदा चांगले पाणी उपलब्ध झाले आहे. रब्बीच्या पेरण्यांना सुरवात झाली आहे.