पुणे ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१८-१९ साठी जिल्ह्यातील २२१ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड केलेल्या गावांमध्ये ‘जलयुक्त’अंतर्गत जलसंधारणाची कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही गावे ‘जलयुक्त’ होऊन भूजल पातळीत वाढ होणार आहे.
मागील पाच ते सहा वर्षांपासून असलेल्या दुष्काळामुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या कमी करण्यासाठी राज्य सरकाराने जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ पासून राबविण्यास सुरवात केली.
त्यासाठी जिल्ह्यातील १८९१ पैकी २०० गावांची निवड पहिल्या वर्षी करण्यात आली होती. दुसऱ्या वर्षी १९० तर तिसऱ्या वर्षी १९० गावांची निवड करण्यात आली होती. यंदाही २२१ गावांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या गावांमध्ये जलयुक्त अभियानाअंतर्गत ओढे खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणे, सिंमेट बंधारे बांधणे, नाला बंडिग, समतल चर खोदणे अशी विविध कामे करण्यात येत आहेत.
२०१६-१७ या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या आराखड्यापैकी ७१४५ कामांपैकी सात हजार ५८ कामे पूर्ण झाली. २०१७-१८ मध्ये प्रस्तावित केलेल्या चार हजार ७७६ कामांपैकी २२६५ कामे पूर्ण केली. लोकसहभागातून एक हजार ७३४ कामे पूर्ण झाली आहेत. ‘सीएसआर’मधून ३८३ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचा फायदा पाणी साठवणुकीसाठी झाला असल्याचे दिसून येतो.
त्यामुळे यंदाही जलयुक्त अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात येण्यात येणार आहे. एक हजार ९० गावांमध्ये ‘जलयुक्त’ची कामे होणे बाकी आहे. येत्या काही वर्षांत या गावांमध्येही कामे हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
तालुकानिहाय निवडलेली गावांची संख्या तालुका | निवडलेली गावे |
भोर | २३ |
वेल्हा | २० |
मुळशी | १५ |
मावळ | २० |
हवेली | १५ |
खेड | २२ |
आंबेगाव | २० |
जुन्नर | ३१ |
शिरूर | ८ |
पुरंदर | २८ |
बारामती | ८ |
इंदापूर | ११ |