जळगाव : खानदेशात मागील २४ तासांत अनेक ठिकाणी जोरदार; तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सोमवारी (ता.२०) रात्रीपासून संततधार कायम आहे. मंगळवारपर्यंत (ता.२१) अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली.
जळगाव जिल्ह्यातील ८९ महसूल मंडळांपैकी सुमारे २१ मंडळांमध्ये दमदार पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाचोरा येथे ३५ मिलिमीटर, रावेरात ४०, यावलमध्ये ५०, चोपडा येथे ५०, जळगावात ४०, धरणगाव येथे ४१, एरंडोलात ४०, चाळीसगाव येथे ४५, जामनेरात ४५ मिलिमीटर पाऊस झाला. मंगळवारी सकाळी ८ पर्यंत भुसावळ येथे २२ तर, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर येथे अनुक्रमे ३५ व ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. साक्री व धुळे येथील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबरोबरच नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत १३ मिलिमीटर, नवापुरात २८, शहादा येथे ३१, तळोदा येथे १५, धडगावात ५६ तर, अक्कलकुवा येते २७ मिलीलिमीटर पावसाची नोंद झाली. उडीद, मूग धोक्यात या पावसामुळे उडीद व मुगाच्या तोडणीवर आलेल्या शेंगांचे नुकसान होण्याची स्थिती आहे. तापी व गिरणा काठानजीकच्या अनेक गावांमध्ये मूग तोडणीवर आला आहे. त्याच्या कोरड्या होत आलेल्या शेगांमध्ये कोंब निघण्याची स्थिती आहे. नुकसानीच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी सकाळीच मूग तोडणी अनेक ठिकाणी सुरू केल्याचे सांगण्यात आले.
धरण साठ्यात वाढ धरणसाठा फारसा वाढलेला नाही. हतनूरचे आठ दरवाजे उघडे आहेत. त्यात ४० टक्के जलसाठा आहे. गिरणामध्ये ३९ टक्के, वाघूरमध्ये ३७.७६ टक्के, अनेरमध्ये ५१, अभोरामध्ये ७५, मोर धरणात २८ टक्के जलसाठा झाला. मंगरूळ, सुकी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर पश्चिम भागातील अग्नावती, भोकरबारी, बहुळा, मन्याड, अंजनी या मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्केच जलसाठा असल्याची स्थिती आहे.