नांदेड : जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. १५) जाहीर केली. सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.
कृषी उत्पादनाचा निकष निर्धारित करण्यासाठी राज्यात पीक पैसेवारी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यात राज्य शासनाच्या कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून पिकांची पैसेवारी निश्चित करण्यात येते.
शासन आदेशानुसार निर्धारित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाने ता. ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले होते. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्यावर जाहीर करण्यात आली. यानंतर शासन नियमानुसार सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले.
यंदा सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर ऑक्टोबरमधील जिल्ह्यातील एकूण एक हजार ५६२ गावांतील आठ लाख ४२ हजार ८६७ हेक्टर लागवडीलायक क्षेत्रापैकी सात लाख ८५ हजार ३३ हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांची कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात आली.
तीन टप्प्यांत पैसेवारी
दरवर्षी हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबर, सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर; तर अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन जाहीर करते. शासनाच्या तीन नोव्हेंबर २०१५ च्या शासन आदेशानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारी पद्धतीचा आधार घेतला जातो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.