जळगाव : जिल्ह्यात जळगाव, यावल, रावेर व बोदवड तालुक्यात पावसाअभावी पिकांची स्थिती अनेक भागात नाजूक बनली आहे. या तालुक्यांमध्ये १० ते १५ दिवसांचा पावसाचा खंड आहे. यामुळे स्थिती बिकट बनत आहे.
जिल्ह्यात पावसाची टक्केवारी चांगली आहे. पाऊस ५४ टक्क्यांपर्यंत झाला आहे. प्रशासनही चांगला पाऊस झाल्याचे दावे करीत आहे. परंतु, जळगाव तालुक्यातील गिरणा काठच्या भागात पावसाचा खंड १५ दिवसांचा आहे. या तालुक्यातील कानळदा, विदगाव, ममुराबाद, खेडी खुर्द, वडनगरी, भादली, कडगाव, नांद्रा बुद्रूक आदी भागात पाऊस अत्यल्प आहे. यावल तालुक्यातही पाडळसा, चिखली बुद्रूक, हिंगोणा, टाकरखेडा, कोसगाव, वनोली आदी भागात पावसाअभावी पिकांची अवस्था नाजूक बनली आहे.
रावेरातील सातपुडालगतच्या केऱ्हाळे व इतर भागात पाऊस कमीच आहे. तर, बोदवडमधील नाडगाव, मूनूर आदी भागात पाऊस हुलकावणी देत आहे. मागील पाच ते सात दिवसांत या भागात अगदी हलका किंवा तुरळक पाऊस झाला. यामुळे पिकांना दिलासा मिळाला नाही. जुलैमध्ये दोनदा जोरदार पाऊस झाला. परंतु, जुलैमध्ये १५ दिवस पावसाचा खंड पडला. सकाळपासून ऊन तापत होते. यामुळे जमिनीतील आर्द्रता लवकर नष्ट झाली. पिके माना टाकत आहेत. काळ्या कसदार जमिनीतही स्थिती बिकट आहे. उडीद, मूग, कोरडवाहू कापूस, मका, या पिकांना मोठा फटका बसला असून, उत्पादन ३० ते ४० टक्के घटणार आहे. आमच्या भागात पावसाअभावी पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. ज्वारी, उडीद, मूग ही पिके हातची गेली आहेत. फुलगळ झाली असून, उत्पादन निम्मे कमी होणार आहे. - देवेंद्र पाटील, चिखली बुद्रूक (ता.यावल, जि.जळगाव)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.