जळगाव : जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात एकट्या रावेर तालुक्यातील अभोरा, सुकी व मंगरूळ या तीन प्रकल्पांचा समावेश आहे. तर जामनेर तालुक्यातील तोंडापूर प्रकल्पदेखील १०० टक्के भरला आहे.
जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने हे प्रकल्प भरले. जून, जुलै व ऑगस्टमध्ये या भागातही पाऊस नव्हता. रावेर तालुक्यातील तिन्ही पूर्ण भरलेले प्रकल्प हे सातपुडा पर्वतालगत आहेत. सातपुडा पर्वतरागांमध्ये सप्टेंबरच्या मध्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे नद्या व नाल्यांना पूर आला. तोंडापूर प्रकल्पाचे लाभक्षेत्र हे अजिंठा पर्वतरागांमध्ये आहे. या भागातही जोरदार पाऊस झाला होता.
सद्यःस्थितीला जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या हतनूर प्रकल्पाचे दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडे आहेत. या प्रकल्पात ८१.३६ टक्के जलसाठा आहे. तर गिरणा धरणामध्ये ७४.९२ आणि वाघूर धरणामध्ये ७४.२५ टक्के जलसाठा आहे. विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा (टक्के) ः मोर ७६.९६, अग्नावती ८.३२, हिवरा १४.१४, बहुळा ३६.२३, अंजनी ३२.१८, गूळ ७९.३५, भोकरबारी ४.८९.