नगर ः जिल्ह्यामध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’चे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत तीन तालुक्यांसह ९३५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षातून सांगितले जात आहे. यंदा एक लाख शौचालये बांधली की जिल्हा हागणदारीमुक्त होईल, मात्र बांधलेल्या किती टक्के शौचालयांचा वापर सुरू आहे, याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे. स्वच्छता कक्षांकडूनही त्याबाबत फारसे गांभीयाने घेतले जात नाही.
जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत सध्या ‘स्वच्छ भारत अभियान’चे काम वेगात सुरू असल्याचे दाखवले जात आहे. आतापर्यंत अकोल्यात ९६, जामखेडमध्ये १८, कर्जतमध्ये ६०, कोपरगावात ४८, नगरमध्ये ४७, नेवाशात ७३, पारनेरमध्ये १३०, पाथर्डीत ३८, राहात्यात ५८, राहुरीत ९४, संगमनेरमध्ये ९८ आणि शेवगावात ७३, श्रीगोंद्यात ४७ आणि श्रीरामपूरमध्ये ५५ अशा ९३५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. राहाता, पारनेर, श्रीरामपूर, राहुरी हे तालुके हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहेत. अजून काही गावे हागणदारीमुक्त झाली असून ते जाहीर होणे बाकी आहे.
जिल्ह्यामध्ये सहा लाख ३३ हजार २६२ कुटुंबे आहेत, त्यातील ५ लाख २८ हजार ६६२ कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. यंदा एक लाख चार हजार शौचालये बांधण्याचा लक्ष्यांक आहे. त्यातील काही वैयक्तिक शौचालये बांधून झाली आहेत. यंदा कोणत्याही परिस्थितीत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा चंग स्वच्छता कक्षाने बांधला आहे. मात्र असे असले तरी आतापर्यंत बांधलेल्या सव्वापाच लाख कुटुंबापैकी किती लोक प्रत्यक्ष शौचालयांचा वापर करतात, हे मात्र स्वच्छता कक्षाकडून सांगितले जात नाही.
सामान्य लोकांना वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी बारा हजारांचे अनुदान दिले जाते. आतापर्यंत किती कुटुंबांना अनुदान दिले याबाबतही जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाकडे माहिती नाही. त्यामुळे गावे हागणदारीमुक्त करण्याचा जिल्हा परिषदेने धडाका लावला असला, तरी शौचालय वापराबाबत शंका निर्माण होत आहे.
जर शौचालयाचा वापर होत नसेल तर हागणदारीमुक्त म्हणता येईल का, असा प्रश्न एका ज्येष्ठ सदस्याने व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता कक्षाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.