धुळे ः जिल्ह्यात कापूस लागवड यंदा रोडावण्याचे संकेत असले तरी कृषी विभाग जेवढे क्षेत्र मागील वर्षी होते, तेवढीच लागवड होईल हे गृहीत धरून बीटी बियाण्यांचा पुरवठा करण्याची तयारी करीत आहे. त्याअनुषंगाने सुमारे १४ लाख बीटी बियाणे पाकिटांची गरज जिल्ह्याला असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात मागील हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के लागवड झाली होती. यंदा सुमारे १० ते १२ टक्के लागवड कमी होईल, असा अंदाज काही बियाणे पुरवठादार व कृषी केंद्रचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.कारण कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यात एवढे नुकसान झाले, की कापूस पिकासाठीचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले.
त्यात जिल्ह्यातील शिरपूर, धुळे भागातील ज्या शेतकऱ्यांनी देशी कापूस वाणांची लागवड केली, त्यांना बऱ्यापैकी उत्पादन हाती आले. तसेच, अनेक शेतकऱ्यांनी कृषी संस्थांच्या कापूस वाणांची लागवड केली होती, त्यांनाही उत्पादन मिळाले. त्यामुळे शिरपूर, शिंदखेडा व धुळे भागात देशी कापूस वाणांची लागवड अधिक होऊ शकते. काही खासगी संस्थाही देशी वाणांच्या संदर्भात शिंदखेडा व शिरपूर भागात दाखल झाल्या आहेत.
अर्थात, देशी कापूस वाणांची फक्त तीन टक्के मागणी होती, ती या हंगामात सुमारे १५ ते १८ टक्के राहू शकते. बीटी कापूस बियाण्यांची मागणी ९५ टक्क्यांवरून ८३ ते ८५ टक्क्यांवर येऊ शकते. देशी कापूस वाण जिल्ह्यात वेळेत उपलब्ध होत नाहीत. म्हणून त्यांचा पुरवठा लवकर व्हायला हवा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पूर्वहंगामी कापूस लागवड जिल्ह्यात सुमारे १५ ते १६ हजार हेक्टरपर्यंत असणार आहे. शिरपूर व शिंदखेडा भागातील तापीकाठ आणि धुळे तालुक्यातील नेर, कुसुंबे, कापडणे भागात ही लागवड असेल, अशी माहिती मिळाली.