पुणे ः दरवर्षी शेतकऱ्यांना भात पिकाची लागवड ते मळणी करण्यासाठी मनुष्यबळाची मोठी कमतरता भासते. त्यावर मात करण्यासाठी भात उत्पादकांचा यांत्रिकीकरणाकडे कल वाढत आहे. यंदा कृषी विभागाच्या माध्यमातून भात पट्यातील शेतकऱ्यांनी ५४ अवजारांची खरेदी केली आहे. येत्या खरीप हंगामापासून हे शेतकरी यांत्रिकीकरणावर भर देणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुके भात पिकासाठी ओळखले जातात. या भागातील शेतकरी दरवर्षी जून ते जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भात लागवड करतात. त्या वेळी मनुष्यबळाची मोठी अडचण भासते. त्यामुळे भात लागवडीस उशीर होतो. त्याचा परिणाम उत्पादन आणि उत्पन्नावर होतो. त्यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी भात उत्पादक यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत.
जिल्ह्यात भाताचे जवळपास ६४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ५० ते ६० हजार हेक्टरवर भात लागवड होते. परंतु लागवड ते काढणीवेळी भात उत्पादकांना मजुरांची मोठी समस्या भासते. ही समस्या कमी करण्याचे कृषी विभागाने ठरविले आहे.
यंदा कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लागवडीसाठी भात लावणी यंत्र, भात कापणीसाठी कापणी यंत्र आणि रिपर, रिपर कम बाईंडर तसेच मळणीसाठी भात मळणी यंत्रे भात उत्पादकांना देण्याचे ठरविले आहे. त्यास भात उत्पादकांनी चांगला प्रतिसाद दिला असून कृषी विभागाच्या माध्यमातून ३१ लाख ९१ हजार २४६ रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.