सोलापुरात थेट वाटाघाटीची भूसंपादनाची १७२ प्रकरणे निकाली
सोलापूर : जानेवारी २०१७ मध्ये सरकारने भूसंपादनाचा नवा निर्णय जाहीर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना संबंधित भूसंपादनाचा मोबदला थेट वाटाघाटीद्वारे दिला जातोय. आतापर्यंत जिल्ह्यातील १७२ प्रकरणांना नव्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे. त्याचा ४ हजार २३ शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याची माहिती भूसंपादन कार्यालयाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाझर तलाव, कालवे, राष्ट्रीय व राज्य महामार्ग यांसह अन्य विविध कामांसाठी जमिनी संपादित करण्यात आल्या. तसेच काही ठिकाणी बाजारभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून भूसंपादनाला टोकाचा विरोध झाला. त्यामुळे अनेक प्रकल्पांची कामे रखडतात आणि त्यामुळे त्याची किंमत भविष्यात वाढते. त्यातून कायमस्वरूपी मार्ग काढण्याकरिता आता शेतकऱ्यांना थेट वाटाघाटीद्वारे मोबदला मिळत असल्याने बहुतांश प्रमाणात होणारा विरोध कमी झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत संबंधित जमिनीचा दर निश्चित करून तो संबंधित शेतकऱ्याला दिला जातो. त्यानुसार भूसंपादन कार्यालय क्रमांक एकअंतर्गत बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यातील २१, क्रमांक तीन अंतर्गत बार्शी, मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील ११, मोहोळ तालुक्यातील ४७, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १२, माढा व करमाळ्यातील ३७, माळशिरसमधील एक आणि मंगळवेढ्यातील ४३ प्रकरणांचा निपटारा थेट वाटाघाटीद्वारे करण्यात आल्याची माहिती भूसंपादन अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी दिली.
भूसंपादन प्रकरणे | १७२ |
संपादित एकूण क्षेत्र | १०७७.३९ हेक्टर |
शेतकरी संख्या | ४,०२३ |