1. कापूस वायद्यांमध्ये आज चढ उतार सुरु होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ८८.५३ सेंटवर पोचले होते. तर देशातील वायद्यांमध्ये भाव काहीसे वाढून ६१ हजार रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. एका खंडीमध्ये ३५६ किलो रुई असते. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव दबावातच आहेत. अनेक बाजारांमधील व्यवहार सध्या थंडावले आहेत. पण नव्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे वायदे सध्या १३.८८ डाॅलरवर आहेत. पण सोयापेंडचे वायदे ४०० डाॅलरपेक्षा अधिकच्या पातळीवर दिसतात. देशातही प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनचे भाव ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस या पातळीदरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
3. मागील हंगामात देशातील उडीद उत्पादन घटले होते. त्यामुळे उडदाचे भाव तेजीत आले. यंदाही उडदाची लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाली. तसेच उडीद पिकाला कमी पावसाचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उडदाचे भाव प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही उडदाची आवक वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उडदाचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
4. बाजारातील आवक वाढल्याने कारल्याच्या भावातील तेजी कमी झाल्याचे दिसते. मागील दोन आठवड्यांमध्ये कारली आवक जवळपास ३० टक्क्यांनी वाढली. यामुळे दरावर दबाव दिसतो. कारल्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी २ हजारांचा भाव मिळत आहे. पण कारली पिकाला सध्या कमी पावसाचा फटक बसत आहे. तसेच पुढील काळात आवक कमी होऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
5. आले उत्पादकांना सलग पाच ते सहा वर्षे मोठा आर्थिक फटका बसला. दराच्या घसरणीच्या कालावधीत शेतकरी चांगला नफा मिळेल या आशेने लाखो रुपयांचा भांडवली खर्च करत होते. मात्र बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक आतबट्ट्याचे ठरत होते. परंतु जानेवारी महिन्यापासून आल्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. जानेवारी महिन्यात प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा होत गेली.
जुलै महिन्यात आल्याला विक्रमी १३ हजार ते १४ हजारांचा भाव मिळत होता.पण ऑगस्टमध्ये दरात काहीशी घट झाली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंगही केले. याचा दबाव दरावर वाढला. पण ही नरमाई जास्त दिवस टिकली नाही. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुन्हा दरात वाढ झाली. सध्या आल्याला प्रतिक्विंटल १२ हजार ते १३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यंदाही कमी पाऊस आणि दुष्काळी स्थितीचा आले पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे यंदाही आले उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. परिणामी आले दरातील सुधारणा पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.