Jaggery Market
Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : सौदे बंदचा ‘कडवटपणा’ गूळ उत्पादकांच्या मुळावर

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून गुळाच्या ‘गोडव्या’ला सौदे (Jaggery Deal) बंदमुळे कडवटपणा आला आहे. अजूनही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने बाजार समितीत (Kolhapur Jaggery Market) नियमित सौदे सुरू होण्यास तयार नाहीत. जादा दर देण्याचा गूळ उत्पादकांचा (Jaggery Producer) आग्रह, बाजारभावाप्रमाणे दर देण्याची व्यापाऱ्यांनी घेतलेली भूमिका आणि हतबल बाजार समिती असेच चित्र गेल्या चार दिवसांपासून गूळ बाजारात आहे.

बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेला फुटणारे फाटे आणि मूळ प्रश्‍न बाजूला राहून होत असलेला गोंधळ सौदे बंदला कारणीभूत ठरत आहे. चार दिवसांच्या कालावधीत सुमारे सात हजार गूळ सौद्याच्या प्रतीक्षेत आहेत. सौदे वेळेत झाले नाहीत, तर पूर्ण रवे खराब होण्याची शक्यता आहे. गुळाचे नुकसान होत असल्याचे कोणताच घटक मान्य करण्यास तयार नाही.

हक्काच्या हंगामात गूळ सौद्याला लागलेला ब्रेक हा सामान्य गूळ उत्पादकांना चिंताग्रस्त करत आहे. कोल्हापुरी गुळाचा नावलौकिक कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वच घटकावर असताना प्रत्येक घटक आपापले म्हणणे दामटण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे विमनस्क चित्र बाजार समितीत आहे. जादा दर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा सुरू असलेला संघर्ष कर्नाटकी गुळाच्या आवकेवर येऊन पोहोचला. बाजार समितीने कर्नाटक गूळ येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतरही शेतकऱ्यांनी सौदे सुरू करण्यास प्राधान्य दिले नाही.

आम्हाला ३७०० च्या वरच दर हवा, अशी जोरदार मागणी करत गूळ उत्पादकांनी गूळ असतानाही सौदे काढू दिले नाहीत. बाजार भावाप्रमाणे दर्जानुसार जो दर आहे तोच दर गुळाला देणार त्याच्यापेक्षा जास्त दर देऊन तो आम्ही बाहेर जाता दराने कसा विकू? घेणारा तो कसा विकत घेईल, असा सवाल करत शेतकरी सांगतील त्यापेक्षा जादा दराने गूळ विकत घेण्यास नकार दिला.

या प्रश्‍नी नेहमीच हतबल असणारी आणि बघ्याची भूमिका घेणारी, वर्षाला कोट्यवधी रुपयांचा सेस घेणारी बाजार समितीही काहीच करू शकत नसल्याचे वेदनादायी चित्र आहे. प्रत्येक घटकाने आपले म्हणणे रेटायचे आणि शेवट काय तर सौदे बंदच हा पर्याय आता गूळ उत्पादकांनाही अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर बाजारपेठ ही गूळ उत्पादकांसाठी महत्त्वाची ठरत असल्याने लांबच्या बाजारपेठेत ही गूळ नेणे परवडत नाही. सौदे बंदच्या हत्याराऐवजी गूळ हंगाम सुरू ठेवून अशा प्रश्‍नाची चर्चा अपेक्षित आहेत. सौदे बंद राहिले की सर्वच घटकांचे नुकसान होते हे कोणालाच मान्य होत नाही हे दुर्दैवी आहे.

चर्चेचे ‘गुऱ्हाळ’ नेहमी लांबणारे

गूळच उतरला गेला नाही आणि गुळाचा दर्जा बिघडला तर त्याचे नुकसान कोणावर याचाही विचार होताना दिसत नाही. सौदे बंद केल्याशिवाय आपले म्हणणे रेटता येत नाही हे आता सर्वच घटकांना माहीत झाले आहे. सौदे बंदीसाठी कधी शेतकरी कारणीभूत ठरतो, कधी व्यापारी, अडते तर कधी माथाडी कामगार.

हंगाम सुरू झाला की ठरावीक दिवस गेले, की प्रत्येक घटकाला आपल्यावर अन्याय झाल्याची उपरती होते आणि तो लगेच सौदा बंद करतो. गूळ हा नाशीवंत माल असल्याने त्याचा त्या दिवशी सौदा व पॅकिंग होणे गरजेचे असते. इतके असूनही चर्चेचे ‘गुऱ्हाळ’ नेहमी लांबत जाते. त्याचा फटका पुढील काही दिवस सौद्यावर वर होतो हेही दिसून आले आहे. सर्वच घटकांनी घेतलेली आडमुठी भूमिका ही गूळ उद्योगासाठी मात्र धोक्याची घंटा ठरत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT