Mango season
Mango season Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hapus Season : हापूस हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत

राजेश कळंबटे

Ratnagiri News : जानेवारीच्या अखेरीस आलेल्या हापूस कलमांच्या मोहराचे उत्पादन १५ मेनंतर आंबा बागायतदारांच्या हाती लागणार आहे. त्यामुळे यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हापूसचा हंगाम लांबेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरवर्षी मे अखेरीस आंबा हंगाम संपुष्टात येतो. त्याचा फायदा निश्‍चित सर्वसामान्यांना होईल.

रत्नागिरी जिल्ह्यातील हापूसचे उत्पादन यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट आले आहे. फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल झाला होता. त्याचा परिणाम हापूसच्या दरावरही झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. ‘एल निनो’ आणि ‘ला निनो’च्या प्रभावामुळे वातावरणातील बदल आंबा हंगामावरही परिणामकारक ठरलेले आहेत.

गतवर्षी आंब्याचे उत्पादन अत्यंत कमी होते. कोकण कृषी विद्यापीठाच्या अहवालानुसार हे उत्पादन १२ टक्क्यांपर्यंतच राहिले. जी झाडे गतवर्षी मोहरलेली नव्हती, ती यंदा मोठ्या प्रमाणात मोहरली. त्याचबरोबर जानेवारीत पडलेल्या थंडीमुळे अखेरच्या टप्प्यातही कलमांना मोहर आला. पहिल्या टप्प्यातील उत्पादन हाती येत असतानाच दुसऱ्या टप्प्यातील मोहर वांज गेला होता.

तर तिसऱ्या टप्प्यातील मोहरावर प्रचंड प्रमाणात थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाला. परिणामी दोन्ही मोहरातून कमी उत्पादन हाती येण्याची शक्यता लक्षात घेऊन बागायतदारांनी शेवटच्या टप्प्यात आलेला मोहर जतन करण्यासाठी फवारण्या सुरू केल्या. त्या मोहराला फळधारणा झाली असून त्यामधून १५ मे नंतर उत्पादन हाती येण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त आहे.

समुद्रकिनारी परिसरातील बागायतीमधील आंबा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. उर्वरित परिसरातील बागांत आंबा काढणी जोरात सुरू आहे. सध्या मुंबई, पुण्यासह अहमदाबाद अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये दिवसाला ६० ते ६५ हजार पेटी दररोज जात आहे.

याबाबत ज्येष्ठ आंबा बागायतदार जयंत फडके म्हणाले, की यंदाचा आंबा हंगाम शेवटपर्यंत राहील. मात्र एपिलअखेरपासून ते अगदी १५ मे पर्यंत आंबा खूप कमी राहील. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मोहरातील उत्पादन साधारणपणे १० जूनपर्यंत राहील, असा अंदाज आहे.

किनारी भागातील आंबा वेळेत आहे. उशिरा आलेला मोहर हा बागायतदारांनी जतन केला आहे. दरवर्षी बागायतदार शेवटचा मोहर खुटून टाकतात. मात्र यंदा तो जतन केला गेला. फेब्रुवारीत आलेल्या मोहराला तुडतुड्याचा प्रभाव तितकासा होत नाही. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यातील फळे लवकर पक्व कशी होतील याकडे बागायतदारांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच गतवर्षी जी झाडे मोहरलेली नव्हती, ती यंदा सगळीच आली आहेत.
- डॉ. महेश कुलकर्णी, सहायक प्राध्यापक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT