पुणेः देशात यंदा पामतेलाची (Palm oil)आयात घटली. तर सोयातेल (Soya oil) आयात वाढली. पामतेलातील तेजीमुळे (bullish trend) आयात घटल्याचं एसईएने सांगितले. असं असलं तरी एकूण खाद्यतेल (Edible oil) आयातीत यंदा वाढ झाली. भारताने यंदा १६ लाख टन सोयातेलाची आयात (Import) केली. मागील वर्षी हा आकडा ९ लाख टनांवर होता. यंदा सोयातेल आयातीत ७२ टक्क्यांनी वाढ झाली. देशाचे तेल वर्ष नोव्हेंबरपासून सुरु होते. यंदा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत खाद्यतेल आयात ७.२० टक्क्यांनी वाढली, असे साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन अर्थात एसईएने म्हटलंय. देशात या काळात ४६ लाख टन खाद्यतेल आयात झाले. तर मागील वर्षी याच काळात ४३ लाख टनांची आयात झाली होती. यंदा पहिल्या चार महिन्यांत पामतेलाची आयात घटली. मागीलवर्षी या काळात २६ लाख टन पामतेल देशात आले होते. मात्र यंदा २१ लाख टनच आयात झाली, असेही एसईएने म्हटले. हे ही वाचाः सोयाबीन दराला पुन्हा उभारी
कोरोनाकाळात उत्पादन घटल्याने दरात मोठी वाढ झाली होती. दराने विक्रमी पातळी गाठली. त्यामुळे पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल यांच्यातील तफावत कमी झाली. परिणामी आयातदारांनी सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयातीला पसंती दिली. मागील वर्षी एकूण खाद्यतेल आयातीत पामतेलाचा हिस्सा ५४ टक्के होता. तो यंदा ४६ टक्क्यांपर्यंत घटला. सोयातेलाची आयात वाढल्याने पामतेल आयात घटली, असे एसईएचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी सांगितलं. भारताने यंदा १६ लाख टन सोयातेलाची आयात केली. मागील वर्षी हा आकडा ९ लाख टनांवर होता. यंदा सोयातेल आयातीत ७२ टक्क्यांनी वाढ झाली. भारत सोयातेल प्रामुख्याने ब्राझील आणि अर्जेंटीनातून आयात करतो. तर अमेरिका आणि टर्कितूनही काही प्रमाणात तेल येते. यंदा सोयातेल आयातही महागली आहे. मागील वर्षी १५०६ डाॅलर प्रतिटनाने सोयातेल आयात झाले. मात्र यंदा हा दर १५९५ डाॅलरवर पोचला, असेही मेहता यांनी सांगितले. हे ही वाचाः युध्दामुळे खाद्यतेल महागाई वाढण्याची भीती
केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली. त्यानंतर देशात रिफाईंड पामतेलाची आयात वाढून कच्चे पामतेल कमी झाले. मागील वर्षी कच्चे पामतेल आयात २५ लाख टनांवर होती. ती यंदा १६ लाख टनांपर्यंत आली. तर रिफाईंड पामतेल आयात २१ हजार टनांवरून ५२ लाख टनांवर पोचली. मात्र रिफाईंड पामतेल आयातवाढीला एसईचा विरोध आहे. रिफाईंड तेल आयात वाढल्यास देशातील रिफायनरी उद्योग बंद पडेल. रिफायनरी उद्योगाने क्षमतावाढ केली आहे. त्यामुळे कच्चे तेल आयात व्हावी. त्यामुळे सरकारने कच्चे पामतेल आणि रिफाईंड पामतेल आयात शुल्कातील तफावत अधिक ठेवावी, अशी मागणीही मेहता यांनी केली. देशाच्या विविध बंदरांवर ४९ लाख टन खाद्यतेल आहे. तर १४ लाख टन तेल आयातीच्या प्रक्रियेत आहे, असेही मेहता यांनी सांगितलं.