use Drip irrigation to provide the right amount of fertilizer and water as per crop requirement
पिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे माती परीक्षण करावे. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसेच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घ्यावे. त्यानुसार विद्राव्य खताची मात्रा ठरवावी. पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रामुख्याने मातीचे गुणधर्म, पाण्याची प्रत आणि वनस्पतीचा प्रकार यावर अवलंबून असते. पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण मुख्यतः केशमुळाद्वारे होते. पिके निरोगी राहण्यासाठी मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अशा १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यांपैकी एखादे जरी अन्नद्रव्य कमी पडले तरी पिकांची वाढ निरोगीपणा होत नाही.
ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे फायद्याचे आहे. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक सिंचनातून द्यावा. पिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे माती परीक्षण करावे. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसेच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घ्यावे. त्यानुसार विद्राव्य खताची मात्रा ठरवावी. ठिबक सिंचनाद्वारे खतांची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. खते एक दिवसाआड देणे शक्य नसल्यास आठवडा किंवा पंधरवड्यातून एकदा द्यावीत. यामुळे खताची वापर कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. सर्व परिस्थितीत अचूक व समप्रमाणात खतांचा वापर शक्य होतो. खते पाण्याबरोबर झाडांच्या मुळांच्या कक्षेत पडत असल्यामुळे नेमके समान पाणी व खत मुळांच्या क्षेत्रात उपलब्ध करता येते. खताची मात्रा झाडाची गरज व हवामानातील परिस्थितीनुरूप वेळेवर उपलब्ध करता येते. पाण्याची कार्यक्षमता ४० ते ५५ टक्के आणि खतांची कार्यक्षमता २५ ते ३० टक्के इतकी वाढते. ठिबक सिंचन पद्धतीने पिकास पाणी दिल्याने पिकाच्या कार्यक्षम मुळाच्या कक्षेत ओलावा निर्माण होतो. दिलेली खते या भागातच पसरतात. त्यामुळे ती जमिनीतून वाहून निचरा होत नाहीत किंवा साठून राहत नाहीत. पिकांच्या संवेदनक्षम अवस्थांनुसार आवश्यक तेवढी खताची मात्रा एकूण वाढीच्या कालावधीत अनेकवेळा विभागून देता येतात. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. पीक लवकर तयार होते. उत्पादनात २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होते. विद्राव्य खते वापरामुळे दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन मिळते. गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. हलक्या व कमी प्रतीच्या जमिनीत सुद्धा पीक घेता येते. आम्लयुक्त विद्राव्य खतामुळे ठिबक संचामध्ये आपोआपच रासायनिक प्रक्रिया होते. ठिबक यंत्रणा बंद पडत नाहीत. विद्राव्य खतामध्ये सोडिअम व क्लोरीनचे प्रमाण अत्यल्प असते. पारंपरिक पद्धतीने खते देताना जमीन तुडवली जाऊन घट्ट होते. मुळांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही. ठिबक सिंचन संचातून खते दिल्याने हे टाळता येते. खते संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी असावीत. खते आम्लधर्मी असावीत. विद्राव्य खते घन स्वरूपात उपलब्ध असावीत. यामुळे हाताळणी व वाहतूक करण्यासाठी सुलभ असतात. विद्राव्य खते क्लोराईड्स व सोडिअमसारख्या हानिकारक मूलद्रव्यापासून मुक्त असावीत. विद्राव्य खते पाण्यात विरघळल्यावर साका तयार होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. विद्राव्य खतामध्ये दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असावीत. संपर्क- डॉ.शशीशेखर जावळे, ७५८८१५५४४९ (मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)