Automatic Weather Station Agrowon
ग्रामविकास

Rural Development : सरपंचांनो, हवामान बदलानुसार आराखडा करा

Team Agrowon

डॉ. सुमंत पांडे

मागील काही वर्षात आपण निसर्गाचा बदललेला स्वभाव अनुभवतो आहोत. अगदी मागील एक दशकाचा इतिहास जरी घेतला तरी किमान तीन ते चार वर्षे दुष्काळ आणि अतिवृष्टीची आढळतात. सध्या देशात आणि महाराष्ट्रात एल निनो चा प्रभाव जाणवतो आहे. त्याचा परिणाम पर्जन्यावर झाला आहे. एल निनो चा प्रभाव सर्वत्र सारखा असतो असे नाही. यास वातावरणीय बदल कारणीभूत आहे असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

गावात देखील याचा फटका सातत्याने बसतो आहे. दुष्काळ,अतिवृष्टी, अचानक येणारी गारपीट, वादळे इत्यादीचा परिणाम थेट शेती व्यवसायाशी संबंधित आहे. कोरडवाहू शेतीला याचा फटका जास्त बसला आहे. भात लागवडीस योग्य वयाची रोपे उपलब्ध न होणे, फळबागांच्या बहरावर परिणाम होणे, फळगळ होणे,किडींचा प्रादुर्भाव वाढणे इत्यादी अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

यासाठी ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांना या विषयाचे आकलन होणे अगत्याचे आहे. अनेक सुशिक्षित लोकप्रतिनिधी आता ग्रामपंचायतीच्या कारभारात आले असल्याने त्यांना या बाबींचा अभ्यास आहे; तथापि सर्वच प्रतिनिधींनी याबाबत जागरूक असणे अपरिहार्य आहे. जागतिक आणि राज्यस्तरावर देखील याचे पूर्वानुमान देण्यात येतात. या बाबी लक्षात घेऊन गावाचा आपत्कालीन आराखडा तयार असणे आवश्यक ठरते. म्हणून आपण हवामान बदलाबाबत विस्ताराने जाणून घेणार आहोत.

हवामान बदलाचे स्वरूप

संयुक्त राष्ट्र संघाने हवामान बदलाची व्याख्या करताना सांगितले आहे की, तापमान आणि वातावरणाच्या पद्धतीत दीर्घकालीन बदल. हे बदल नैसर्गिक देखील असू शकतील. तथापि १८०० सालापासून मानवी हस्तक्षेपामुळे याची तीव्रता वाढलेली आहे. जीवाश्म इंधनाचा (कोळसा, पेट्रोल डिझेल,गॅस इत्यादी) मोठ्या प्रमाणावर वापर आणि त्यांच्या जळण्याने उष्णता वाढ करणाऱ्या वायूची निर्मिती होते. यातून हवामान बदल दिसतात.

जागतिक स्तरावर औद्योगीकरण, वाढती लोकसंख्या, बेसुमार जंगलतोड, नैसर्गिक आणि मानव निर्मित घडामोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन,आणि मिथेन इत्यादी सारख्या हरित वायूचे प्रमाण नैसर्गिक प्रमाणापेक्षा वाढल्याने पृथ्वीच्या तापमानात १८८० पासून सरासरी ०.८० अंश सेल्सिअस इतकी वाढ झाल्याने वातावरणात बदल होत आहेत. यामुळे जागतिक स्तरावर अनेक बदल घडत आहेत.

समुद्राच्या पातळीत सुमारे २३ सेंमी इतकी वाढ.

अनियमित पाऊस.

तीव्र दुष्काळ.

मोठे पूर.

जमिनीतील पोषक द्रव्याचा असमतोल.

पाणथळ क्षेत्रात वाढ.

अन्न सुरक्षा.

रोगराईत होणारी वाढ.

जैवविविधतेचा आणि जंगलांचा ऱ्हास.

सागरी किनाऱ्याची धूप.

मासेमारीवर परिणाम.

लोकवस्ती, स्थलांतर,आकस्मिक पूर,काही ठिकाणी तीव्र दुष्काळ.

हवामान बदलाचा इतिहास

१८९६ मध्ये वातावरणातील कार्बन डायॉक्साईडच्या पातळीत बदल झाल्यास त्याचा परिणाम तापमान वाढीत होवू शकतो असे स्वीडिश शास्त्रज्ञाने पहिल्यांदा मांडले होते. त्यानंतर १९३८ मध्ये गाय कॅलेंडर या शास्त्रज्ञाने पृथ्वीच्या तापमानाचा, जागतिक हवामान बदलाचा आणि कार्बन डायॉक्साईड याचा थेट संबंध प्रस्थापित होतो असे

प्रतिपादन केले.

(संदर्भ:https://climate.nasa.gov)

हरितगृह वायू

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित झालेली अवरक्त किरणे हरितगृह वायू शोषून घेतात आणि ती पृथ्वीवर परावर्तित करतात. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि त्यालगतचे वातावरण तापते. हरितगृह वायूंमध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि बाष्प हे वायू आहेत. पृथ्वीवरील इतर वायूंच्या तुलनेत त्यांचे प्रमाण कमी असले तरी, पृथ्वीवरील ऊर्जेच्या ताळेबंदावर त्यांचा प्रभाव खोलवर होतो. पृथ्वीचा इतिहास पाहता, हरितगृह वायूंच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढले आहे.

हरितगृह वायूंचा परिणाम

विशेषत: औद्योगिक क्रांतीनंतर झालेले जीवाश्म इंधनांचे ज्वलन, पर्यावरणात हरितगृह वायूंचे (कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ओझोन आणि क्लोरोफ्ल्युओरोकार्बन) प्रमाण वाढण्यास जबाबदार आहेत. पृथ्वीच्या विविध घटकांमध्ये घडून येणाऱ्या आंतरक्रिया आणि प्रतिभरणेही हवामान बदल घडवून आणतात. एखाद्या भागातील वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची घनता यांमुळे त्या प्रदेशात उष्णतेची परावर्तकता वाढते. त्याचवेळी, वनस्पतींद्वारे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे ती पर्यावरणात मिसळते. वनस्पतींमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण बदलते, जिवंत वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, तर मृत वनस्पतींच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते.

मानवी कृती

अनेक हवामान तज्ज्ञांच्या मते, मानवी कृतींमुळे जागतिक तापमानासारखी पर्यावरणीय समस्या उद्भवली आहे. याकरिता जीवाश्म इंधनांचे ज्वलन आणि यासारख्या मानवी कृती जबाबदार आहेत. तसेच पर्यावरणात सोडले जाणारे मिथेन आणि क्लोरोफ्ल्युरोकार्बन (औद्योगिक स्रोत) हे हरितगृह वायू या समस्येत भर घालतात.

आता शास्त्रज्ञांनी वृक्षाच्या खोडाच्या वलयांचा आणि प्रवाळांचा अभ्यास सुरू केला आहे. वृक्षांच्या खोडातील वलये, प्रवाळ आणि हिमस्तर यांच्या अभ्यासातून असे आढळले आहे की, विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात पृथ्वीचे सरासरी तापमान निश्चित वाढलेले आहे.

हवामान बदलाचे परिणाम गांभीर्याने घ्या...

पृथ्वीच्या वातावरणात होत असलेले बदल, तसेच वातावरण आणि पृथ्वीच्या भूशास्त्रीय, रासायनिक, जैवभौगोलिक घटक यांच्यातील आंतरक्रियांमुळे होत असलेले बदल, या दोन्हींच्या परिणामी पृथ्वीच्या हवामानात वेळोवेळी जे बदल घडून येतात त्यांना ‘हवामान बदल’ म्हणतात. पृथ्वीचे वातावरण हा एक गतिमान द्रायू (द्रव अथवा वायू) आहे. त्याचे भौतिक गुणधर्म, गती व गतीची दिशा यांवर सौर प्रारणे, भूखंडांचे भौगोलिक स्थान, सागरी प्रवाह, पर्वतरांगांचे स्थान व दिशा, वातावरणातील रासायनिक प्रक्रिया आणि भूपृष्ठावरील वनश्री इत्यादींचा प्रभाव असतो.

या घटकांमध्ये काळानुसार बदल होत असतो; काही घटक जसे सागरी प्रवाहातील उष्णतेचे वितरण, रासायनिक प्रक्रिया, वनश्री इ. थोड्या कालावधीत बदलतात, तर इतर घटक उदा., खंडांची स्थिती, पर्वतरांगांची उंची इत्यादीमध्ये बदल व्हायला प्रदीर्घ कालावधी लागतो. थोडक्यात वातावरणाचे भौतिक गुणधर्म आणि गती यांपासून हवामान उद्भवते आणि कोणत्याही दीर्घ किंवा अल्प कालावधीमध्ये त्यात बदल घडत असतात.

अनेकदा हवेच्या स्थितीत त्याठिकाणाचे तापमान, अवक्षेपण, आर्द्रता आणि वाऱ्याचे प्रमाण अशा बाबी लक्षात घेतल्या जातात. या बाबी म्हणजेच कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती वातावरणातील अस्थिरतेमुळे सतत बदलत असते. हवेची स्थिती जशी दिवसागणिक बदलते, तसे हवामानही दिवसरात्रीच्या चक्रापासून कोट्यवधी वर्षांच्या भूशास्त्रीय कालखंडापर्यंत सतत बदलत असते. कोणत्याही दोन वर्षांचे, दोन दशकांचे, दोन सहस्रकांचे हवामान सारखे नसते.

पृथ्वीचे वातावरण हे समुद्र, हिमनग, भूपृष्ठभाग तसेच त्यावरील वनस्पतींचे आच्छादन यांच्याशी जोडलेले असते आणि याद्वारे प्रभावित होत असते. या सगळ्यांची मिळून ‘भूसंस्था’ बनते. पृथ्वीवर सुमारे ७०.८ टक्के पाणी आणि २९.२ टक्के जमीन आहे. या पाण्यापैकी ९६.५ टक्के भाग हा समुद्राने व्यापला आहे. समुद्राच्या कोणत्याही बदलाचा जसे की प्रवाह, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान , सागरी प्रवाह यांचा परिणाम जमिनीवर होणे स्वाभाविक आहे.

हवामानामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वनश्रीचे वितरण बदलते. जसे शुष्क प्रदेशात वाळवंट वाढतात, तर दमट प्रदेशांत वने वाढतात. याउलट वनस्पतींद्वारे वातावरणात उष्णता परावर्तित झाल्यामुळे, जमिनीतील पाणी वातावरणात बाष्पाच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते. यामुळे वाहणाऱ्या वाऱ्याच्या हालचालींवर प्रभाव पडतो. त्यामुळे हवामानावर परिणाम होतो.

भूसंस्थेचा अभ्यास करताना हवामानशास्त्र, भूशास्त्र, पारिस्थितिकी, समुद्रविज्ञान, हिमविज्ञान (ग्लेशिओलॉजी) आणि सामाजिक शास्त्रे यांचा अभ्यास केला जातो. भूसंस्थेचे पूर्ण आकलन होण्यासाठी तिच्यात कालानुसार कसे बदल झाले, याची माहिती असावी लागते. यातूनच भूसंस्थेचा इतिहास विकसित झालेला आहे. त्याकरिता पुराजीवविज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांची मदत झाली आहे.

भूसंस्थेचा इतिहास लिहिताना घडलेल्या घटनांबरोबरच सौर प्रारणे, सागरी प्रवाह, भूखंडांचे स्थान, वातावरणाची रासायनिक स्थिती आणि इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये झालेले बदल लक्षात घेतले गेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT