Parthenium Hysterophores
Parthenium Hysterophores Agrowon
ॲग्रो गाईड

गाजर गवत निर्मूलनासाठी मेक्सिकन भुंग्यांचा वापर

टीम ॲग्रोवन

गाजर गवत हे बारमाही तण असून, दिवसेंदिवस याचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टिरोफोअर्स (Parthenium hystirophores) असे आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या भागांत गाजर गवताला काँग्रेस गवत, पांढरफुली, चटकचांदणी अशा नावांनी ओळखले जाते. रस्त्यांच्या कडेला, तळ्याशेजारी, नदीनाल्या काठी, पडीक जमिनी तसेच विविध पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवताचा प्रादुर्भाव दिसून येतो. गाजरगवताचा मानवी आरोग्यासह पीक उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतो.

गाजर गवताच्या समूळ निर्मूलनासाठी १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या काळात ‘गाजर गवत जागरूकता सप्ताह’ आयोजित केला जातो. याद्वारे गाजर गवताचे एकात्मिक पद्धतीने निर्मूलन करण्याविषयी जनजागृती केली जाते. गाजरगवताच्या जैविक नियंत्रणासाठी ‘मेक्सिकन भुंगे’ म्हणजेच झायगोग्रामा बायकोलरॅटा हे कीटक अत्यंत फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. या मित्रकीटकाच्या वापराने गाजर गवतावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते.

ओळख व जीवनक्रम ः

- प्रौढ भुंगे मळकट पांढरे असून, त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात.

- मादी भुंगे वेगवेगळे किंवा गुच्छ स्वरूपात पानाच्या खालील बाजूवर अंडी घालतात.

- अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात. त्यामुळे गाजर गवताची वाढ आणि फुले येण्याची क्रिया थांबते.

- अळी अवस्था साधारण १० ते ११ दिवसांची असते. तर कोष अवस्था ९ ते १० दिवसांची असते. कोष अवस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतून निघून गाजर गवताच्या पानावर उपजीविका करतात.

- पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. नोव्हेंबर नंतर पुन्हा हे भुंगे जमिनीत ७ ते ८ महिने लपून बसतात. आणि पुढील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस जमिनीतून बाहेर येऊन गाजरगवताचा नाश करण्यास सुरुवात करतात.

भुंगे कोठे आणि किती सोडावेत ः

शेतात हेक्टरी ५०० भुंगे सोडावेत. भुंगे शक्यतो मानवी आणि प्राण्यांचा शिरकाव नसलेल्या ठिकाणी सोडावेत. नव्या ठिकाणी भुंगे सोडण्यासाठी भरपूर भुंगे असलेल्या गवतावरील ५०० ते हजार भुंगे पकडून ते १० ते १५ सेंमी उंचीच्या प्लॅस्टिक बाटलीत ठेवावे. बाटलीस जाळी असलेले झाकण लावावे. तसेच बाटलीत गाजर गवताचा पाला खाद्य म्हणून टाकावा. गाजर गवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमिनीच सुप्त अवस्थेत जातात.

या भुंग्याचा मानवी तसेच इतर पशुपक्ष्यांना कोणताही त्रास होत नाही. भुंगे दिवसा कार्यरत असल्यामुळे त्या वेळी जमा करणे टाळावे. सकाळी किंवा संध्याकाळी भुंगे गोळा करावेत.

गाजर गवत नियंत्रणासाठी जैविक पद्धतीची गरज ः

रासायनिक तणनाशकांचा वापर हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे. तसेच रासायनिक तणनाशके महाग असल्याने त्यांचा वारंवार वापरा करणे परवडणारे नाही. गाजरगवत हे विषारी असल्याने ते उपटण्यासाठी मजूर वर्ग सहज तयार होत नाही. त्यामुळे जैविक नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे ठरते. मेक्सिकन भुंगे हे आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायद्याचे आहे.

--------------

- संजय बडे, ७८८८२९७८५९

(सहायक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT