Zero Tillage
Zero Tillage Agrowon
ॲग्रो गाईड

काय आहे शून्य मशागत तंत्रज्ञान ?

Team Agrowon

जमिनीची मशागत न करता (शून्य मशागत) (Zero Tillage) सर्व निविष्ठांचे संवर्धन करुन उत्तम शेती करण्याचा प्रकार म्हणजे संवर्धित शेती. हे तत्व सगुणा राइस तंत्रामध्ये (एसआरटी) (SRT Technology) वापरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट व पीक उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादनही वाढते. मालेगाव- नेरळ (ता. कर्जत, जि. रायगड) येथे विकसित झालेले हे तंत्र आता राज्य, परराज्य आणि परदेशातही पोहोचले आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एसआरटी तंत्राचे विशेष महत्व आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाशी जुळवून घेत हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करावा या उद्देशाने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकल्पांतर्गत एसआरटी तंत्राचा अधिकाधिक प्रसार होण्यास मदत होणार आहे.

हवामान बदलाचे परिणाम
- मागील काही वर्षामध्ये पर्जन्यमानातील अनिश्चितता जसे पावसाचे एकूण कमी दिवस, कमी वेळेत जास्त पाऊस, सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसाचा तीन आठवड्यांपेक्षा जास्त खंड, मान्सूनचे उशिरा आगमन व वेळेपुर्वी निघून जाणे, गारपीट व अवेळी पाऊस असे हवामान बदल दिसून येत आहेत.
- हवामान बदलामुळे पाणी टंचाई पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेत घट, कृषी उत्पादन वाढीचा दर घटणे इ. कारणामुळे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांमध्ये नैराश्य, ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर होऊ लागले आहे.
- वाढत्या तापमानामुळे कोरडवाहू पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. जमिनीतील कर्बामध्ये व ओलाव्यामध्ये घट होते. कमी कालावधीत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची प्रचंड धूप होते.अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकाकरीता पाणी उपलब्धत होत नाही. अशा वातावरणातील बदलामुळे भारतीय शेतीवर संभाव्य दूरगामी परिणाम दिसून येत आहेत,

संवर्धित शेतीची गरज का आहे ?
दूरगामी परिणामांचा विचार करता बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार व अवलंब करणे आवश्यक आहे. जमिनीच्या सुपिकतेचा देखील ऱ्हास होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी हवामानाशी अनुकूल “संवर्धित शेती” पद्धती अवलंबल्यास जमिनीच्या संवर्धनाबरोबरच उत्पादन खर्चामध्ये लक्षणीय घट होत असल्याचे दिसून आले आहे.

शून्य मशागत तंत्रज्ञान
संवर्धित शेतीसाठी “शून्य मशागत” या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावी दिसून आलेला आहे. शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषीभूषण चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी सगुणा बाग, तालुका-कर्जत, जिल्हा-रायगड येथे भात पिकासाठी “सगुणा राईस तंत्र (एस आर टी)” विकसित केले असून सदर तंत्राची संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संस्थेने नोंद घेतली आहे. या तंत्राचा राज्याच्या कृषि विभागामार्फत व्यापक प्रसार करण्यात येत आहे. या तंत्राचा अवलंब भाताबरोबरच इतरही पिकांमध्ये फायदेशीर असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत असल्याचे औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीशाळामध्ये आढळून आलेले आहे.

शेतीशाळेतून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा प्रसार
- प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत शून्य मशागत हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शेतीशाळा, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कार्यशाळा इ. माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. तंत्राची उपयुक्तता लक्षात घेता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शेतीशाळेमध्ये एसआरटी तंत्राचा प्रायोगिक तत्वावर अवलंब करण्यात येत आहे. यामध्ये खरीप हंगामात कापूस, रबी हंगामात मका आणि त्यानंतर झेंडू पिकाचे यशस्वीपणे उत्पादन घेण्यात आले आहे.
- पहिल्या वर्षी गादी वाफ्यावर पिकांची लागवडी नंतर कोणतीही मशागत नाही आणि त्यानंतर दुसऱ्या पिकाची लागवड आणि दुसऱ्या पिकाच्या कापणीनंतर पुन्हा मशागत न करता तिसऱ्या पिकाची लागवड अशी शून्य मशागतीची पद्धती असून मागील दोन वर्षामध्ये प्रकल्प गावांमध्ये शेतीशाळेमध्ये याबद्दलची निरीक्षणे घेण्यात आलेली आहेत.
- राज्यातील सर्व कृषी हवामान विभागांमध्ये बहुतांशी सर्व पिकांसाठी शून्य मशागत तंत्र फायदेशीर ठरले आहे. म्हणूनच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवलंबले जावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत.

स्त्रोत ः शून्य मशागत तंत्र पुस्तिका ः विजय कोळेकर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT