Paddy
Paddy Agrowon
ॲग्रो गाईड

Paddy : शेतकरी पीक नियोजन : भात

टीम ॲग्रोवन

रिळ, ता.जि. रत्नागिरी येथे मिलिंद वैद्य यांची शेती आहे. त्यात प्रामुख्याने १५० गुंठ्यांवर भात लागवड (Paddy Cultivation) तर उर्वरित क्षेत्रामध्ये फळबाग लागवड (Orchard Cultivation) आहे. त्यांच्याकडे आंब्याची ९०० झाडे, काजूची १५० झाडे, नारळ १०० झाडे तर सुपारीची १५० झाडे आहेत.

मिलिंद हे १९९२ पासून भातशेती (Paddy Farming) करतात. सुरुवातीला वडिलोपार्जित ४० गुंठ्यांवर पारंपरिक पद्धतीने घरच्या वापरापुरतेच भाताचे उत्पादन (Paddy Production) घेत होते. पुढे आधुनिक पद्धतीने भात लागवड करायची असे ठरवून त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रयोगशील शेतकरी आणि दापोली कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांसोबत चर्चा केली. त्यानंतर १९९६ च्या दरम्यान आधुनिक पद्धतीने भात लागवडीस सुरवात केली. सुरुवातीला २५ ते ३० गुंठे क्षेत्रावर सगुणा (एस.आर.टी) पद्धतीने भात लागवड केली. त्यानंतर लागवड क्षेत्रात वाढ करत गेले. या पद्धतीमुळे मशागत आणि खतांवरील खर्चात ५० टक्के पर्यंत बचत होते. तसेच पावसाने ओढ दिल्यास उत्पादनावर जास्त परिणाम होत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. दरवर्षी मृग नक्षत्रावर पेरणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यानुसार सर्व बाबींचे कोटेकोर पूर्वनियोजन केले जाते. कृषी विभागामार्फत ‘उत्कृष्ट शेतकरी’ या राज्यस्तरीय पुरस्काराने २०१८ मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. भात पीक कापणीनंतर भाजीपाला लागवड करतात.

रोपवाटिका नियोजन ः

- भात लागवडीसाठी मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच नियोजन केले होते. त्यानुसार लागवड क्षेत्राची भाजावळ केली. भात लागवडीनंतर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी भाजावळ फायदेशीर ठरत असल्याचा माझा अनुभव आहे.

- दरवर्षी भात लागवडीसाठी सुवर्णा, रत्नागिरी ७, रत्नागिरी-८ आणि कुडा (लाल रंगाची पारंपरिक जात) अशा विविध जातींची वेगवेगळी रोपवाटिका केली जाते.

- दीडशे गुंठे क्षेत्रावर लागवडीसाठी साधारण ९ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार केली जाते. त्यानुसार साधारण ११ जून रोजी पाऊस पडल्यानंतर भात बियाणांची गादीवाफ्यांवर पेरणी केली.

- रोपवाटिकेसाठी सुवर्णा जातीची ३ गुंठे, रत्नागिरी-७ ची २ गुंठे, रत्नागिरी-८ ची ३ गुंठे आणि कुडा जातीची १ गुंठे क्षेत्रावर बियाणांची पेरणी केली.

- पेरणीपूर्वी सर्व बियाणास जैविक आणि रासायनिक बीजप्रक्रिया केली. पेरणीच्या एक दिवस आधी गोमूत्र, पाणी, मीठ आणि वारूळाची माती एकत्र करून त्यात बियाणे टाकून ठेवले जाते.

- रोपवाटिकेत युरिया २ किलो आणि शेणखत ५० ते ६० टोपल्या प्रति गुंठे प्रमाणे मात्रा दिली.

- भाजावळ केल्यामुळे रोपवाटिकेत तणांचा प्रादुर्भाव आढळून आला नाही.

- साधारण २१ दिवसांनी रोपांची पुनर्लागवड केली जाते. तोपर्यंत पुनर्लागवडीसाठी निवडलेले क्षेत्र तयार केले जाते.

पुनर्लागवडीचे नियोजन ः

- भात रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी साधारण ८ वेळा ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची उभी- आडवी नांगरणी करून घेतली. योग्यप्रकारे नांगरणी केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो.

- नांगरणी केल्यानंतर चांगले कुजलेले शेणखत ४०० किलो प्रति गुंठा आणि मोहोटचा पाला टाकून घेतला. मोहोटाच्या पाल्यामुळे हिरवळीचे खत तयार होते. त्यानंतर पत्री पेंड १ किलो, एरंड पेंड २ किलो, नीम पेंड २ किलो एकत्र करून जमिनीत खत म्हणून टाकले जाईल.

- पॉवर टिलरच्या साह्याने योग्यप्रकारे चिखलणी करून घेतली.

- सध्या भात रोपांच्या पुनर्लागवडीची कामे सुरु असून सुमारे ७० टक्के क्षेत्रावर लावणी पूर्ण झाली आहे. रोपांची लागवड चारसूत्री पद्धतीने केली आहे.

आगामी नियोजन ः

- सुवर्णा, रत्नागिरी -८ या जातींसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खताच्या मात्रा दिल्या जातील. त्यानुसार लावणीनंतर २० दिवसांनी

डीएपी २ किलो प्रति गुंठा प्रमाणे दिले जाईल.

- कुडा जातीच्या भात लागवडीमध्ये फक्त सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. त्यानुसार पेंड, गांडूळ खताचा वापर केला जाईल.

- बदलत्या हवामानामुळे भात लागवडीमध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे वेळोवेळी निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातील.

- मावा, तुडतुडे इत्यादी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भात लागवडीच्या बांधावर वरी, उडीद पिकांची लागवड केली जाईल.

- बांधावर झेंडू लागवड केली जाईल. झेंडू फुलांच्या विक्रीतून किरकोळ उत्पादन खर्च निघण्यास मदत होते.

-------------------

- मिलिंद वैद्य, ९४२१२३३८४८

(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT