भुईमूग हे सर्वांत जुने तेलबिया पीक महाराष्ट्रात व देशात सर्वच भागांत प्रामुख्याने खरिपात घेतले जाते. मागील दोन दशकांपासून सोयाबीन, सूर्यफूल, पामतेल आदी पर्याय उपलब्ध झाल्याने भुईमूग लागवडीसाठी शेतकरी फारसा उत्सुक नाही, तसेच मिळणारा बाजारभाव व मजुरांची कमतरता असल्याने या पिकाखालील क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. परंतु, भुईमूग हे असे पीक आहे की त्यापासून सकस चारा, तेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की) सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळते. भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.
भुईमुगाचे महत्त्व : भुईमुगाची खरीप हंगामातील उत्पादकता सुमारे १००० किलो तर उन्हाळी हंगामात १४०० किलो प्रति हेक्टर आहे. खरिपातील उत्पादकता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. देशातील एकूण उत्पादनापैकी ८० टक्के तेलासाठी, १० टक्के प्रक्रिया करून खाणे व १० टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (२५ टक्के) आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्य आहे.
लागवड तंत्रज्ञान :
वाण | पक्वतेचा कालावधी (दिवस) | प्रकार | हंगाम | सरासरी उत्पादन (क्विं./हे.) | शिफारशीत जिल्हे |
एस.बी.11 | 105 - 110 | उपटी | खरीप, उन्हाळी | खरीप : 12 - 14 उन्हाळी : 20-25 | संपूर्ण महाराष्ट्र |
फुले प्रगती (जे.एल.-24) | 90-95 | उपटी | खरीप | 18 - 20 | संपूर्ण महाराष्ट्र |
टीएजी -24 | खरीप : 100-105 उन्हाळी : 110-115 | उपटी | खरीप, उन्हाळी | खरीप : 12 -14 उन्हाळी : 30-35 | संपूर्ण महाराष्ट्र |
फुले व्यास (जे.एल.-220) | 90 - 95 | उपटी | खरीप | 20-24 | जळगाव, धुळे, अकोला |
टी.एम.व्ही. -10 | 120 - 125 | निमपसरी | खरीप | 22-23 | सांगली, कोल्हापूर |
आयसीजीएस-11 | 125 - 130 | निमपसरी | खरीप | 20 - 30 | सांगली, कोल्हापूर |
कोयना (बी-95) | 125 - 130 | निमपसरी | खरीप | 25 - 30 | पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर |
एम-13 | 120-125 | पसरी | खरीप | 13 - 17 | सांगली, कोल्हापूर, सातारा |
कराड 4 -11 | 140 - 145 | पसरी | खरीप | 15 - 20 | बीड उस्मानाबाद |
फुले उनप (जे.एल.-286) | 90-95 | उपटी | खरीप/उन्हाळी | 20 - 24 | पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे |
टीपीजी-41 | 125 - 130 | उपटी | रब्बी/उन्हाळी | 25-28 | पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे |
जेएल-501 | खरीप : 105 - 110 उन्हाळी : 115-120 | उपटी | खरीप/उन्हाळी | खरीप : 18 - 20 उन्हाळी : 30 - 35 | -संपूर्ण महाराष्ट्रासाठी |
आरएचआरजी - 6083 | 120 | उपटी | खरीप/उन्हाळी | 30 - 35 | संपूर्ण महाराष्ट्रासाठी |
आरएचआरजी -6021 | 120 - 125 | उपटी | उन्हाळी/खरीप | 30 - 35 | पश्चिम महाराष्ट्रासाठी |
फुले भारती (जेएल-776) | 110 - 115 | उपटी | खरीप | 20 - 25 | उत्तर महाराष्ट्रासाठी आणि मध्य प्रदेश |
बीजप्रक्रिया : रोपावस्थेत उद्भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाची पाच ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी, तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम व पीएसबी या जीवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे.
पेरणी अंतर : सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणीयंत्राच्या साह्याने दोन ओळींतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. जेणेकरून हेक्टरी ३.३३ लाख इतकी रोपांची संख्या ठेवता येईल. टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याची २५ टक्के बचत होते. पेरणीच्या वेळी बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रतिहेक्टरी ३.३३ लाख रोपे मिळतात. पेरणी पाच सेंमी खोलवर करावी.
पेरणी पद्धत : भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने करता येईल. सपाट वाफा पद्धत : पेरणी सपाट वाफ्यावर करायची झाल्यास ३० सेंमी अंतर असलेले पेरणीयंत्र वापरून वाफशावर पेरणी करावी किंवा बियाणे टोकून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर ३० सेंम तर दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे व पाणी द्यावे. त्यानंतर ७-८ दिवसांनी न उगवलेल्या जागी नांग्या भरून घ्याव्यात. इक्रिसॅट पद्धतीने लागवड ः या पद्धतीस रुंद वाफा पद्धत म्हणतात.
इक्रिसॅट पद्धतीचे फायदे :
सेंद्रिय खते : ७.५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रतिहेक्टरी पूर्वमशागत करताना शेवटच्या कुळवणीआधी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमीन भुसभुशीत होते. त्याचबरोबर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तसेच जमिनीतील लाभदायक सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढून जमिनीचे आरोग्य चांगले राखले जाते, तसेच शेणखतातून महत्त्वाच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन पीकवाढीवर चांगला परिणाम दिसून येतो.
रासायनिक खते : खरीप हंगामात पेरणीवेळी २५ किलो नत्र (युरिया खतातून), ५० किलो स्फुरद (एसएसपी खतातून) प्रतिहेक्टरी द्यावे. भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये आवश्यक असतात. त्याचबरोबर गंधक व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. त्यामुळे स्फुरद हे अन्नद्रव्य एसएसपी खतातून द्यावे. पेरणीवेळी २०० किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे, तर उर्वरित २०० किलो जिप्सम हे आऱ्या सुटताना द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते. उन्हाळी भुईमुगासाठी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ४०० किलो जिप्सम असे प्रमाण ठेवावे.
अन्नद्रव्ये शिफारसी :
जैविक खते : भुईमूग हे द्विदलवर्गीय पीक असल्याने तसेच त्याच्या मुळावरील गाठींमुळे ते वातावरणातील नत्र वायू जमिनीत स्थिर करण्यास मदत होते. त्यासाठी रायझोबियम या जैविक खताची बीजप्रक्रिया करण्यासाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात वापरण्याची शिफारस आहे. स्फुरदाची उपलब्धता वाढविण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या (पीएसबी) खताची बीजप्रक्रिया करावी.
सूक्ष्म अन्नद्रव्ये :
आंतरमशागत : भुईमुगाचे पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या १५-२० दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या १०-१२ दिवसांच्या अंतराने कराव्यात. ३५-४० दिवसांनंतर आऱ्या सुटू लागल्यानंतर कोणतेही आंतरमशागतीचे काम करू नये. फक्त मोठे तण उपटून टाकावे म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल.
तणनाशकाचा वापर : तणनाशकाचा वापर करून निंदणी व दोन कोळपण्या दिल्या तर तणांचा चांगला बंदोबस्त होतो.
तणनाशकांची शिफारस :
पाणी व्यवस्थापन : खरीप भुईमुगासाठी ४० ते ५० सें.मी. तर उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सेंमी पाणी लागते. परंतु प्लॅस्टिक आच्छादित तंत्रामुळे ४०-५० टक्के पाण्याची बचत होते. तुषार सिंचन पद्धत ही प्लॅस्टिक आच्छादन तंत्राने घेतलेल्या भुईमुगासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. जी पीकवाढीसाठी उपयुक्त ठरते. तसेच तुषार सिंचनाने समान पद्धतीने पाणी देता येते.
कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन :
काढणी : भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८-९ टक्क्यांपर्यंत खाली आणावे.
उत्पादन : सुधारित पद्धतीने भुईमुगाची पेरणी योग्य पद्धतीने संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून हेक्टरी २०-२५ (खरीप), तर ३०-३५ (उन्हाळी) क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच ४-५ टन कोरडा पाला मिळण्यास काहीच हरकत नाही.
संपर्कः डॉ. सुदाम पाटील- ९८५०३२७८७३ (लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव येथे कार्यरत आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.