health Benefits of Turmeric
हळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे भारतात प्राचीन काळापासून हळदीचा वापर विविध औषधांमध्ये वापर केला जातो. हळद एकाच वेळी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवते, सुरेख रंग देते यासोबतच त्वचा समस्या कमी करते. यामुळे खाद्य पदार्थांसोबतच सौंदर्य प्रसाधनामध्ये हळदीचा मोठा वापर होतो. जागतिक पातळीवरील एकूण उत्पादनांपैकी सुमारे ८० टक्के उत्पादन भारतामध्ये होते. १५ ते २० टक्के हळद निर्यातही होते. उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश प्रथम क्रमांकांवर असून, त्यानंतर ओडिशा, तमिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल आहे. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, चंद्रपूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, नांदेड, नागपूर, हिंगोली, कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यात होते. हळदीमधील करक्यूमिन हा औषधी घटक असून, त्यात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. आपल्या आहारात अशा अँटीऑक्सिडेंट घटकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास विविध आजारांच्या शक्यता कमी होतात. १०० ग्रॅम हळदीमध्ये खालील घटक आढळतात.
पाणी - ६ ग्रॅम ऊर्जा - ३९० कॅलरी प्रथिने - ८.५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ - ८.९ ग्रॅम लोह - ४७.५ मिली ग्रॅम कर्बोदके - ६९.९ ग्रॅम तंतू - ६.९ ग्रॅम निआसीन - ४.८ मिली ग्रॅमकुरकुमीन - २ ते ६ टक्के सुगंधी तेल - ५ टक्केहळद हे मसाला व औषधी पिकांतील प्रमुख पीक आहे. हळद ही भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य अंग असून, त्याचा वापर अन्न, सौंदर्य प्रसाधने, पारंपरिक कर्मकांडे व विधी, औषधे, रंग अशा अनेक बाबींमध्ये केला जातो. भारतीय पाककृतींमध्ये हळदीचा वापर होतो. जवळपास प्रत्येक शाकाहारी वा मांसाहारी पदार्थांत वापर होतो. भारतीय प्राचीन उपचार शास्त्र असलेल्या आयुर्वेदातही हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. भारतीय हळद ही जागतिक पातळीवर सर्वोत्तम मानली जाते.हळदीमधील घटकांमुळे विविध प्रकारच्या संसर्गांपासून तुमचे संरक्षण होते. मुख्यतः घशाला संसर्ग झाला असल्यास दुधात हळद घालून प्यायल्यास त्याचा फायदा होतो.हळदीमुळे जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध होतो. परिणामी हळदीचा वापर जखमांवर लावण्यासाठी केला जातो. त्यातील अँटिसेप्टीक गुणधर्मामुळे जखम लवकर भरून येते.हळद रोज खाल्याने पित्त वाढत असले तरी जेवण पचण्यास मदत होते.आपल्या रोजच्या आहारात नियमितपणे हळदीचा वापर केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.हळदीचे पाणी पिण्यामुळे आपल्या डोके शांत होण्यास मदत मिळते.हळदीमधील एका अँटीऑक्सिडेंट घटकाचा उपयोग कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यासाठी होऊ शकतो. पोट साफ होत नसल्यास गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून ते पाणी घ्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. पोटही साफ होते.हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास मुक्त विषारी कणांशी (फ्री रॅडिकल्स) लढण्यास मदत होते. ‘बायोकेमिस्ट्री ॲण्ड बायोफिजिकल रिसर्च’ मध्ये प्रकाशित एका संशोधनामध्ये हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची पातळी कमी राहते. तसेच टाइप २ च्या मधुमेहाचा धोकाही टळत असल्याचे मांडण्यात आले आहे. डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा बारीक केलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नानावेळी अंगाला लावावे. यामुळे त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.हळद योग्य प्रमाणात सेवन केली तरच ती आरोग्यास खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी हळद सेवन करण्याचे योग्य प्रमाण खालीलप्रमाणे-हळदीचा पाणी स्वरूपातील अर्काचे प्रमाण प्रतिदिन ३० ते ९० थेंब.हळकुंडापासून बनवलेली हळद पूड सेवन करणार असाल तर प्रमाण प्रतिदिन १.५ ते २.५ ग्रॅम. हळदीच्या अर्काचे प्रमाण १५ ते ३० थेंब प्रतिदिन चारवेळा. हळदयुक्त चहासाठी १० ग्रॅम हळकुंडाचा तुकडा १०० मिलिलिटर पाण्यात उकळावा. संपर्क ः सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (संशोधन विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश.)