पाणीटंचाई असल्यास एका सरीत पाचट आच्छादन करुन दुसऱ्या सरीचा वापर सिंचनासाठी करावा.
सद्यःस्थितीत पूर्वहंगामी, आडसाली व खोडवा ऊस हा जाेमदार वाढीच्या अवस्थेत आहे. सुरू ऊस सध्या कांडी धरण्याच्या अवस्थेत आहे. त्या दृष्टिकाेनातून नियोजन करावे.
सिंचनाची सोय असल्यास सुरू उसाची मोठी बांधणी करून घ्यावी.सुरू उसासाठी मोठ्या बांधणीच्या वेळी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५५ किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३४४ किलो) अाणि पालाश ५५ किलो (म्युरेट ऑफ पाेटॅश ९२ किलो) प्रतिहेक्टरी याप्रमाणात खतमात्रा द्यावी.युरियाची मात्रा देताना निंबोळी पेंडीची भुकटी १ किलो अधिक युरिया ६ किलो असे प्रमाण ठेवावे.पूर्वहंगामी आणि आडसाली ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. उन्हाळ्यात त्यांना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणत: ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.खोडवा उसाला (खोडवा ठेवल्यानंतर १३५ दिवसांनी) पहारीच्या साह्याने रासायनिक खतांचा दुसरा हफ्ता नत्र १२५ किलो(युरिया २७२ किलो), स्फुरद ५५ किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ९२ किलो) प्रतिहेक्टरी या प्रमाणात द्यावा.काणी व गवताळ वाढीची बेटे काढून समूळ नष्ट करावीत.उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनाची सोय असल्यास १० ते २० आठवड्यांच्या सुरू व खोडवा उसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रतिआठवडा प्रतिएकरी युरिया ६.५ किलो, युरिया फॉस्फेट ४.५ किलो, म्युरेट ऑफ पोटॅश २ किलो ठिबकसिंचन संचातून द्यावे. अवर्षण परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना :
जास्तीत जास्त क्षेत्रावर ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा.ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी पाणी देताना एक आड एक सरीतून द्यावे.पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या पिकातील खालील पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत. त्यामुळे जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकवून राहण्यास मदत होईल.पिकास पाण्याचा ताण असल्यास लागणीनंतर ६०, १२० व १८० दिवसांनी म्युरेट ऑफ पोटॅश २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर) व युरिया २ टक्के यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन भुकटीची ६ ते ८ टक्के तीव्रतेची (६० ते ८० ग्रॅम प्रतिलिटर) फवारणी करावी.पीक तणविरहित ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी पीक व तण यांच्यात होणारी स्पर्धा कमी होऊन ऊसवाढीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल.शेताच्या सभोवताली उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.लागवड तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी ५ ते ६ टन पाचटाचे आच्छादन करावे. पाचट कुजून त्याची खत म्हणून पिकांना उपलब्धता व्हावी, यासाठी प्रतिटन पाचटावर युरिया ८ किलो, सुपरफॉस्फेट १० किलो याप्रमाणात टाकावे. तसेच रासायनिक खते दिलेल्या ठिकाणापासून थाेड्या अंतरावर प्रतिटन पाचटासाठी पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचे कल्चर १ किलो या प्रमाणात टाकावे.हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करावी. रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपक्रम सामुदायिकरीत्या २-३ वेळा राबवावा.उसावर कांडी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अाहे. नियंत्रणासाठी प्रतिहेक्टरी ५ ते ६ ट्रायकोकार्ड्स मोठ्या बांधणीनंतर दर १५ दिवसांनी ऊसतोडणीपूर्वी १ महिन्यापर्यंत लावावीत.पिकावर खवले किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० टक्के) २.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पांढऱ्या माशीच्या बंदोबस्तासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी (फुले बगीसाईड) १ ते २ किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात फवारणी करावी.ऊस पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव असल्यास इपरिकॅनिया मेल्यॅनोल्युका या परोपजिवी मित्रकीटकांचे ५,००० जिवंत कोष किंवा ५०,००० अंडीपुंज प्रतिहेक्टरी वापरावेत. संपर्क : डॉ. प्रमोद चौधरी, ८२७५५६३५८० (मध्यवर्ती उस संशोधन केंद्र, पाडेगाव.)