Krishna, Phule Harita brinjal variety
सुपीक, मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार जमिनीमध्ये वांगी पिकाचे चांगले उत्पादन मिळते. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते वापरल्यास उत्पादन वाढीस फायदा होतो. जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ असल्यास पिकाची वाढ उत्तम होते. खरीप हंगामासाठी रोपवाटिकेत बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची पुनर्लागवड जुलै-ऑगस्टमध्ये करावी. कमी वाढणाऱ्या, सरळ जातीसाठी हेक्टरी ४०० ते ५०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. संकरित, जास्त वाढणाऱ्या जातीसाठी हेक्टरी १२० ते १५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. प्रति किलो बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रोपवाटिका
रोपे तयार करण्यासाठी ३ मीटर × २ मीटर आकाराचे एक मीटर रुंद व १५ सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावे. दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत, २०० ग्रॅम संयुक्त रासायनिक खत प्रति वाफ्यात मिसळावे. खत व माती यांचे मिश्रण करून गादी वाफ्यात सम प्रमाणात मिसळावे. गादी वाफ्याच्या रुंद बाजूस समांतर १० सेंमी अंतरावर १ ते २ सेंमी खोलीच्या ओळी करून त्यात पातळ बी पेरावे. सुरुवातीच्या काळात वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. बियाणे उगवल्यानंतर पाटाने पाणी दिले तरी चालते. रोपाच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी प्रत्येक वाफ्यास ५० ग्रॅम युरिया दोन ओळींमध्ये काकरी पाहून द्यावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोप कणखर होईल. लागवड करण्या अगोदर आधी एक दिवस रोपांना पाणी द्यावे, जेणेकरून मुळांना इजा होणार नाही, रोपे अलगदपणे उपटली जातील, पुनर्लागवडीनंतर रोपांची मर कमी होईल व नुकसान होणार नाही. लागवडीसाठी ५ ते ६ आठवड्यांत रोपे तयार होतात. रोपे १२ ते १५ सेंमी उंचीची झाल्यावर लागवड करावी.लागवडीपूर्वी जमिनीची उभी-आडवी नांगरट करून चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरंबे तयार कराव्यात.रोपांची लागवड जास्त वाढणाऱ्या संकरित जातींसाठी ९० × ९० सेंमी आणि हलक्या जमिनीत कमी वाढणारी झुपक्या जातींसाठी ७५ × ७५ सेंमी अंतरावर लागवडीचे अंतर ठेवावे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.प्रति किलो बियाण्यास स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावीत. माती परीक्षणानुसार हेक्टरी १५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश द्यावे. अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित ७५ किलो नत्र दोन समान हप्त्यांत विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.१५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमितपणे खुरपणी करून पिकातील तण काढून टाकावे.लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी म्हणजेच झाडांना फुले येणाच्या सुमारास मातीची भर द्यावी. पाण्याचे नियोजन जमीन, हंगाम व हवामानानुसार करावे.फुले व फळे येण्याचा काळ हा अतिशय महत्त्वाचा असतो या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये.फळे मध्यम आकाराची असतात. देठावर भरपूर काटे असून, याच्या फळांचा रंग हिरवा व त्यावर जांभळे आणि पांढरे पट्टे असतात.फळांचा आकार गोलाकार व थोडासा लांबट.खरीप व उन्हाळी हंगामासाठी शिफारस. उत्पादन : ४५० क्विंटल प्रति हेक्टरी.झाडे काटक असतात. फळांचा आकार अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा त्यावर पांढरे पट्टे असतात.फळांचा देठ, पानांवर काटे असतात. उत्पादन : ४०० ते ४५० क्विंटल प्रति हेक्टरी. खरीप हंगामासाठी उपयुक्त. फळे आकाराने मोठी, भरतासाठी उपयुक्त. फळांचा रंग फिकट हिरवा, टोकाकडे पांढरे पट्टे असतात. उत्पादन क्षमता : २०० ते ४८० क्विंटल प्रति हेक्टरी. - डॉ. अनिकेत चंदनशिवे, ०२४२६-२४३३४२ (उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)