ॲग्रो विशेष

Shekhar Gaikwad : नावात काय आहे?

नावात काय आहे, असे विख्यात नाटककार व कवी शेक्सपिअर यांनी म्हटले होते, त्यास आता ४०० वर्षे झाली तरी सुद्धा नावातच सर्व काही आहे असा प्रत्यय पावलोपावली येत आहे. कितीतरी नावे बदललेली आहेत, मग ती माणसांची असो, जनावरांची असो, वस्तूंची असोत की दुकांनाची!

शेखर गायकवाड

नावात काय आहे, असे विख्यात नाटककार व कवी शेक्सपिअर (Shakespeare) यांनी म्हटले होते, त्यास आता ४०० वर्षे झाली तरी सुद्धा नावातच सर्व काही आहे असा प्रत्यय पावलोपावली येत आहे. कितीतरी नावे बदललेली आहेत, मग ती माणसांची असो, जनावरांची असो, वस्तूंची असोत की दुकांनाची!

जन्म वेळेनुसार लहान बाळाचं नाव कोणत्या आद्य अक्षरांनी ठेवायचं हे ठरवले जात होते व आजही काही प्रमाणात तशीच पद्धत आहे. बहुसंख्य गरीब माणसे मात्र दगडू, धोंडू, कोंडू, मंदी, ठकी अशी नावे ठेवत असत. मुद्दामहून कोणाचे लक्ष जाणार नाही व लहान मुलांचे फार कौतुक होणार नाही असा त्याकाळी सामान्य लोकांचा विचार होता.

अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक नावे मध्यम वर्गामध्ये व उच्च वर्गामध्ये ठेवली जात. लग्न झाल्यानंतर कर्तव्य पाहून एकेरी नावांच्या पुढे राव, साहेब, भाऊ, भाऊसाहेब असे शब्द जोडले जात आणि माधवचा माधवराव किंवा रामचा रामभाऊ होत असे. महिलांच्या बाबतीत सीताचे सीताबाई, मंदाचे मंदाबाई, कांताचे कांताबाई होत असे. शाळेमध्ये मात्र प्रत्येकाच्या नावापुढे ‘या’ हा प्रत्यय लावून मधू नावाचे मध्या, रमेशचे रम्या होत असे. कुटुंबामध्ये मात्र थोरल्या बहिणीला अक्का आणि धाकटीला ताई या नावानेच बोलावले जायचे.

जसजसे शिक्षणाचे प्रमाण वाढले, शहरीकरण वाढले तसतशी नावे पण बदलत गेली. सगळ्यात अगोदर आईची मम्मी झाली आणि बाबांचे पप्पा झाले. तेव्हापासून त्यांनी सुद्धा पुस्तकातील नावे वाचून मुलांची नावे ठेवायला सुरुवात केली असावी. आपल्या मुलांची नावे कुटुंबात, गल्लीमध्ये किंवा गावांमध्ये शक्यतो दुसरे नाव नसेल अशा पद्धतीने जाणीवपूर्वक लोक ठरवू लागले. या काळात पूर्वीची दगडोबा, धोंडीबा, नथोबा, बाळू ही नावे मागे पडली.

लहान बाळाचे आयुष्य वाढावे, त्याच्या दोषांचे निराकरण व्हावे व परमेश्‍वराच्या प्रेमापोटी त्यांचे नामकरण मी करीत आहे असा संस्कृत श्लोक होता. पूर्वजांप्रमाणे आपल्या आपल्याला नाव देण्याची नव्या पिढीची इच्छा राहिली नाही. प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध घटना, यावरून नावे ठेवण्याचा काही काळ ट्रेंड आला. सुरभी हा दूरदर्शनवरच्या कार्यक्रमानंतर ‘सुरभी’ हे मुलींचे नाव कुटुंबात ठेवले जाऊ लागले. हिंदी चित्रपट सृष्टीतील अशोक कुमार, धमेंद्र, राजेश, हेमामालिनी, राखी यांच्या नावाप्रमाणे नावे ठेवली जाऊ लागली. १९७०-८० नंतर शिकलेली दुसरी पिढी आल्यावर अधिक मॉडर्न व अवघड नावे ठेवली जाऊ लागली.

त्या वेळेपर्यंत जोडाक्षर असलेली चिन्मय, स्वराली, सूर्यद, ऋचा, अनुश्री, चैत्राली अशी नावे ठेवली जाऊ लागली. आता पुढचा टप्पा गाठला गेला असून, शक्यतो उच्चारही करता येणार नाही आणि लवकर लिहिता पण येणार नाही अशी दुर्बोध नावे ठेवण्याकडे कल आहे. नावांनी राज्याच्या सीमा ओलांडल्या आहेत. दक्षिण भारतीय नावांमध्ये, तर प्रथम गावाचे नाव मग वडिलांचे नाव व त्यानंतर व्यक्तीचे नाव अशा पद्धतीने नावे असतात. पी. टी. उषा या प्रसिद्ध धावपटू असलेल्या ॲथलेटिक्सचे पिलाउल्लाकांडी थेकेपारंबील उषा असे उच्चारणे सुद्धा अवघड आहे.

इंग्रजी भाषेचा प्रभाव सर्व प्रकारच्या नावामध्ये दिसू लागला आहे. किराणा मालाचे दुकान ग्रॉसरी शॉप झाले व केस कर्तनालयाचे हेअर कटिंग सलून झाले आहे. घरांची व सोसायटींचे नावे क्रिसेंट मून, बेलमोंडा, ब्लूबर्ड, प्राईड, ऑप्टीमा अशी पाहिल्यावरती शेकडो वर्षानंतर या ठिकाणी एकही मराठी माणूस राहत नसावा, असा अंदाज करणे सहज शक्य आहे. गाईचे नाव लहानपणी निबंध लिहिताना ‘कपिला’ असे होते आणि बैलांचे सर्जा आणि राजा. आता गाईचे नाव पण हिरॉइन वरून व बैलाचे नाव हिरोवरून ठेवले जात आहे.

काही जमातींमध्ये आजही महाराष्ट्रात परंपरा किंवा अर्थ यांचा कसलाही संबंध न ठेवता प्रॅक्टिकल व दररोजच्या वापरातील शब्दांवरून हॉटेल, म्युझीयम, मोबाईल, घड्याळ अशी माणसांची नावे ठेवली जात आहेत. गेल्या शतकभरात नसलेल्या अनेक वस्तू नव्याने संशोधित झाल्यामुळे त्या नावांची भर आपल्या दैनंदिन वापरात आली आहे. मोबाईल, पेजर, स्मार्ट वॉच, प्रोजेक्टर, हार्डडिस्क‍ अशी नावे वापरात आली आहेत.

घरामधील स्वयंपाकघरामध्ये ग्रील, पेपररोल, पिझ्झा, बर्गर, टिश्यू पेपर अशी नावे आता ओळखीची वाटू लागली आहेत. शेतात काम करताना लागणारे पॉवर टिलर, हॅण्डफोर्क, स्प्रिंकलर, होसपाइप, अशी नावे सर्वसामान्यांच्या बोलण्यात येऊ लागली आहेत. ई- अद्याक्षर लावलेले ई-पेपर, ई-टेंडर, ई-कॉमर्स, ई-चलान, ई-रिक्षा असे शब्द आले आहेत. निसर्गात आढळणाऱ्या वाघ, सिंह, हत्ती, चित्ता यांना काही ठिकाणी माणसांनी नावे दिली आहेत.

युद्धनौकांना विक्रमादित्य, विराट, शक्ती, सह्याद्री अशी नावे दिली आहेत. माणसांच्या मनातील नावे आता सगळ्या वस्तूंना व प्राण्यांना दिली जात असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या कारच्या मॉडेलला व कोविडच्या लसींना सुद्धा नावे दिली जात आहेत. नाव देण्याचा व नाव ठेवण्याचा हा माणसांचा छंद आता कुठपर्यंत जाईल, हे सांगता येत नाही. काही दिवसांनी मुलांची नावे ही ई-२०, ई-२१ अशी झाली तर आश्‍चर्य वाटायला नको. नाहीतरी टेस्ला आणि ट्विटर चा मालक ईलॉन मस्कने त्याच्या नवीन जन्मलेल्या मुलाचे नाव ‘XAE A-12’ असे ठेवले आहे. मानवी जीवनाचे हे सांख्यिकीकरण तर नाही ना?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Rate: केळी दर निश्‍चिती बाबतप्रशासनाची चालढकल

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा ‘जीआर’ मागे घेणार नाही : विखे पाटील

Gokul Dairy Products: ‘गोकुळ’ आइस्क्रीम, बटर बाजारात आणणार

Government Decision: कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपच देणार

Agricultural Damage: पंजाबमध्ये १.८४ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT