Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Level Decrease : नदी काठावरील गावांना पावसाची प्रतीक्षा

Team Agrowon

kolhapur Water Issue : कोल्हापूर जिल्‍ह्यातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी खाली जात असल्‍याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वाढता उन्हाळ्यामुळे पिकांची तहान भागत नसल्‍याची स्थिती आहे. अनेक तालुक्यामध्ये अशी परिस्थीती आहे.

शिरोळ तालुक्यात कृष्णेच्या पाण्याची पातळी नऊ फुटांवर आल्याने नदीकाठच्या अनेक गावातील पाणी पुरवठ्यावर याचा परीणाम झाला आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावर मर्यादा आल्याने नदीकाठच्या गावांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.

शेतीच्या पाण्यावर उपसाबंदी लागू केल्यानंतर शिरोळ तालुक्यातून विविध पक्ष, संघटनांनी याला तीव्र विरोध केला आहे. त्यापाठोपाठ नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने याचा अनेक गावांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

दररोजच्या वेळेपेक्षा चाळीस टक्के पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात केली आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मोजणीनुसार कृष्णेत केवळ नऊ फूट पाण्याची पातळी आहे. दीड महिन्याआधी यापेक्षाही कमी पाणी पातळीमुळे पात्रातील मासे मृत्युमुखी पडले होते.

यानंतर प्रदूषणाविरोधात संताप व्यक्त केला होता. सांगली महापालिकेने स्वतंत्र तरतूद करत प्रथमच नदी प्रदूषणमुक्तीसाठी पाऊल उचलले. नदीकाठावरील गावांनीही भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.

अवकाळी पावसाने एक-दोन वेळा हजेरी लावली असली तरी वाढत्या तापमानामुळे याचा नदीच्या पाणी पातळीवर फारसा फरक पडला नाही. अनिश्चित पावसामुळे शेतीची तहानही भागली नसताना आता पिण्याच्या पाण्यावरही मर्यादा आल्या आहेत. नदीपात्रातच पाणी नसल्याने उपसा आणि पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे.

तालुक्यातील जुने दानवाडमध्ये काही दिवसांपासून पाणीटंचाई आहे. चार नद्यांच्या या गावाला पाणीटंचाई जाणवत असेल तर अन्य काही गावांची स्थिती याहून वेगळी नाही. नदी काठीच पाणीटंचाई भासत असल्याने शहरी भागालाही याच्या झळा बसणार आहेत.

गडहिंग्लजमध्ये चित्री व आंबेओहोळ या दोन्ही प्रकल्पांतील पाण्याचे आवर्तन हिरण्यकेशी नदीत सुरू होऊनही उद्दिष्टाच्या ठिकाणापर्यंत पाणी जाण्यास उशीर होत असल्याने पाटबंधारे विभागाने उपसाबंदी आदेश जारी केला आहे; परंतु अद्याप चोरून पाणीउपसा होत असल्याने पाटबंधारेचा उद्देश असफल ठरत आहे.

यंदाचा पावसाळा लांबणीवर पडण्याच्या शक्यतेने प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा पुरवून वापरण्याची सुरुवात पाटबंधारे विभागाने केली आहे. यावर्षीचा उन्हाळाही कडक आहे. त्यामुळे यापूर्वीच्या चारही आवर्तनातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. आता सुरू असणारे आवर्तन पाचवे आहे.

या आवर्तनात चित्री व आंबेओहोळमधून प्रत्येकी १०० असे एकूण २०० एमसीएफटी पाणी घेण्यात येणार आहे. हे पाणी पूर्वभागातील गावांच्या पाणी योजनांसाठी वेळेत पोहचावे म्हणून आठ दिवसांची उपसाबंदी लागू करण्यात आली; मात्र बंदीतही उपसा सुरू असल्याने उपसाबंदी कागदावरच राहिली आहे.

पंचगंगा योजना बंद पडण्याची भीती

पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी दोन दिवसांत खूपच खालावली आहे. नदी घाट परिसर उथळ आहे. त्यामुळे हा परिसर कोरडा पडल्याचे दिसत आहे. या परिसरातील बहुतांश भाग अद्याप जलपर्णीने व्यापला आहे. तर पश्चिमेस पंचगंगा योजनेचे उपसा केंद्र आहे. पाण्याची पातळी खालावल्यामुळे हे उपसा केंद्र बंद पडण्याची भीती होती.

मात्र अद्याप थोडा पाणीसाठा असल्यामुळे पुढील काही दिवस तरी येथून उपसा करणे शक्य होणार आहे. तथापि, पुढील एक-दोन दिवसांत बंधाऱ्यातील पाणी पातळी खालावल्यास पंचगंगा योजना बंद पडण्याची भीती आहे. धरणातून पाणी सोडल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत नदी पुन्हा प्रवाहित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT