Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात विजेच्या तारांचा स्पर्श होऊन होणारे शेतकऱ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी ‘महावितरण’ने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा इरिगेशन फेडरेशनने दिला.
महावितरण ताराबाई पार्क येथील मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले. ‘इरिगेशन’चे अध्यक्ष माजी आमदार संजय घाटगे व विक्रांत पाटील यांच्यासह शिष्ठमंडळाने काटकर व अधीक्षक अभियंता जी. एम. लटपटे यांची भेट घेतली.
‘महावितरण’कडून वेळेत विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती देखभाल केली नसल्यामुळे गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ४ उमद्या व तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याला केवळ ‘महावितरण’चा कारभारच कारणीभूत आहे. वाहिन्यांच्या अचानक तारा तुटल्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाणे जोखमीचे झाले आहे.
‘महावितरण’कडून विद्युत तारांची दुरुस्ती न करणे, विद्युत खांबावरील विद्युत कंडक्टरची दुरुस्ती न करणे आदी कारणांनी तारा तुटून अपघात होत आहेत. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील विद्युत वाहक तारांची पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.भारत पाटील-भुयेकर, आंबरीषसिंह घाटगे, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, आत्माराम चौगुले, सचिव मारुती पाटील आदी उपस्थित होते.
कार्यवाही न झाल्यास आंदोलने
काटकर यांनी शेतामध्ये जाताना खबरदारी घ्यावी, तुटलेल्या तारेला स्पर्श करू नये, पायात रबरी बूट किंवा चप्पल घालावेत, सतर्क राहून शेती कामे करावीत, असे आवाहन केले. ‘महावितरण’च्या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन देखभाल दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या बाबत ‘महावितरण’कडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि पुन्हा दुर्घटना घडल्यास इरिगेशन फेडरेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा ‘महावितरण’ला दिला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.