Bhokardan News : भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प दुष्काळामुळे कोरडाठाक पडला आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याने आजवर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तब्बल दीड लाख घन मीटर गाळ उपसा केला आहे.
परिणामी या प्रकल्पाच्या पाणी साठविण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असून, शिवाय हजारो हेक्टर क्षेत्रावरील जमीनही सुपीक होण्यास मदत होणार आहे.
भोकरदन शहरासह तालुक्यातील जवळपास तीस गावांना पाणी पुरवठा करणारा दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प अत्यल्प पावसाने मागील पावसाळ्यापासूनच कोरडाठाक पडलेला आहे. परिणामी शहरासह धरणावर निर्भर जवळपास तीस गावांवर पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे मागील कित्येक वर्षांपासून या धरणातील गाळ काढलेला नसल्याने आजरोजी कित्येक टीएमसी मृतसाठा गाळाने व्याप्त आहे. परिणामी धरणाची साठवण क्षमता देखील कमी झाली होती. यंदा दुष्काळाने हे धरण कोरडे पडलेले असल्याने शासनाने पुढाकार घेत जुई धरण गाळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती.
परंतु याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, तरीही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन मागील चार महिन्यांपासून या धरणातून स्वखर्चाने जवळपास दहा ते पंधरा जेसीबी, शेकडो टिप्पर-ट्रॅक्टरने गाळ उपसा सुरू केलेला आहे. आतापर्यंत या धरणातून १ लाख ५९ हजार घन मीटर गाळ उपसा करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे मोजणीदार किरण कतोरे यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.