Water Issue : प्रकल्पात गाळ साठल्याने पाणी समस्येत ‘भर’

Water Stock Effect : गाळ अधिक साचल्यामुळे पाणीसाठा कमी असतो. म्हणून तालुक्यात दर वर्षी पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Mhasadi News : निसर्गाच्या अवकृपेमुळे साक्री तालुक्यात दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. पण केवळ नैसर्गिक आपत्तीमुळेच नव्हे तर शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र जाणवत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण दर वर्षी सर्वच ठिकाणच्या लहान-मोठ्या प्रकल्पांतील गाळ काढणे आवश्यक आहे.

साक्री तालुक्यातील सर्वच लहान-मोठ्या धरणांत सुमारे ६० टक्के गाळ साचल्याचे बोलले जाते. गाळ साचल्यामुळे भविष्यात दुष्काळाचे चटके अधिकच सहन करण्याची वेळ येणार आहे. गाळ अधिक साचल्यामुळे पाणीसाठा कमी असतो. म्हणून तालुक्यात दर वर्षी पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली आहे.

Water Crisis
Water Crisis : राज्यात ग्रामीण भागाच्या घशाला कोरड

गाळ काढण्यासाठी शासनाची उदासीनता दिसून येते. शासनाने ‘गाळमुक्त धरण’ अशी अभिनव योजना आणली होती. शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी असतात यात शंकाच नाही. पण राबविणारी यंत्रणा, अधिकारी चांगले असले, तर शासकीय योजनाचा फायदा तळागाळापर्यंत जाऊ शकतो. गाळमुक्त धरण योजनेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चात गाळ काढून न्यावा अशी तरतूद होती.

प्रकल्पांत अल्प जलसाठा

यंदा भीषण दुष्काळाचे चटके आतापासूनच जाणवायला लागलेले असताना तालुक्यातील पाणी प्रकल्पातील घटती पातळीदेखील चिंताजनक आहे. सध्या तालुक्यातील तीन मध्यम व आठ लघू प्रकल्प मिळून एकत्रित सरासरी केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. साक्री तालुक्यात आदिवासी भागातील काबऱ्याखडक, लाटीपाडा, मालनगाव, जामखेली यांसारखे प्रकल्प आहेत.

Water Crisis
Water Stock : नगर जिल्ह्यात सत्तावीस टक्केच उपयुक्त पाणीसाठा

धरण क्षेत्राजवळ असलेल्या आदिवासी बांधवांना गाळ काढून नेण्यासाठीचा आर्थिक खर्च न परवडणारा आहे. शासकीय मदत मिळाल्यास गाळमुक्त धरण योजनेस बळ मिळणार आहे. तालुक्यात प्रमुख तीन मध्यम, तर आठ लघू प्रकल्प आहेत. तालुक्यातील धरणांविषयीची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता पाटबंधारे विभागाचे शासकीय अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे वास्तव आहे. सद्यःस्थितीत पिंपळनेरच्या लाटीपाडा प्रकल्पाची पाणीसाठ्याची क्षमता १,२५८ एमसीएफटी आहे.

लघू प्रकल्प कोरडेठाक

धरणातून साक्री नगरपंचायतीसाठी फेब्रुवारीत आवर्तन सोडल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. लघू प्रकल्पांनी तळ गाठला असून, पाणी संकट आ वासून उभे आहे. लघू प्रकल्पातील शेलबारी, विरखेल, बुरुडखे प्रकल्पात नगण्य साठा, तर उर्वरित काबऱ्याखडक, बेहेड, शेवाळी, ककाणी, कायकंडा (काळगाव) लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या उन्हामुळे बाष्पीभवनातून प्रचंड घट होत आहे. पुढे तर स्थिती आणखीन बिकट होणार असून, पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com