Rural Development
Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : .. तर शाश्वत ग्रामविकासाचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल

Team Agrowon

डॉ.सुमंत पांडे

Rural Development Update : मोहंजोदाडो, हडप्पा आणि तत्कालीन मानवी सभ्यतांचा उदय हे पहिले नागरीकरण. याकाळात मेसोपोटेमियापासून ते सिंधू खोऱ्यापर्यंत व्यापाराचा विस्तार झाला. यामधील महत्त्वाची बाब म्हणजे भारतीयत्वाचा मूळ भाव हा खेड्यातूनच वृद्धिंगत झाला. प्राचीन काळात ग्रामस्तरावर स्थानिक संस्था अस्तित्वात होत्या. त्यांना सभा, ग्रामणी, ग्रामवृद्ध अशा संज्ञा होत्या.

गुप्तकाळानंतर दक्षिण भारतात गावांना ‘अग्रहार' असे संबोधले जायचे. यामध्ये ग्रामसंस्था आणि तिच्या अनेक उपसमित्या कार्यरत होत्या. याच काळात मध्य भारतात पंचमंडळी, ग्रामजनपद(बिहार) आणि पंचकुल (राजस्थान) अशा रचना अस्तित्वात आल्या.

इसवीसन पूर्व ६०० या काळात महाजनपद अस्तित्वात आली. जैन आणि बौद्ध धर्मास राजाश्रय मिळाला. त्याचा जगभर विस्तार झाला. गंगा,गोदावरी खोऱ्यात वसाहती झाल्या. गोदावरी खोऱ्यातील वसाहतीस ‘अश्मक' असे संबोधले जायचे. याच काळात प्रशासकीय चौकट अस्तित्वात आली, स्थिर झाली आणि त्यात सुधारणा होत गेली.

कौटिल्य आणि पाणिनी यांच्या साहित्यात याचा उल्लेख आहे. या काळात स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर गाव रचनेवर भर होता. अंतर्गत कलह, वादाचे निवाडे स्थानिक स्तरावरच होत असत. गावातील पंचांचा निर्णय सर्व मान्य असायचा. याच टप्यात शेतीमध्ये प्रगती होत गेली.अंतर्गत विनिमयाचे साधन हे शेतीमाल,वस्तू आणि सेवा हेच होते.

आपली ग्रामरचना या सर्वांना पूरक अशीच होती. त्यावेळेची सुबत्ता ही शेती आणि पशुधन हेच होते. ही रचना आत्मनिर्भर आणि परस्पर पूरक होती. आपली ग्रामव्यवस्था मजबूत आणि एकसंध असल्याने अनेक आक्रमणे झाली तरी ती अबाधित राहिली.

भारतीय परंपरा या लोकशिक्षणाचे महत्त्वाचे साधन आहे,आजही काही ठिकाणी या परंपरा जपल्या जातात.आजच्या काळात याला आपण चक्रीय अर्थव्यवस्था असे म्हणतो. आजही खेड्यातील काही चालीरिती, प्रथा पूर्वी होत्या तेवढ्या उपयुक्त आहेत. जसे की, शेतकरी हा यजमान मानला जायचा आणि इतर कौशल्य असलेले आणि शेती नसलेले कारागीर त्याला मदत करायचे.

यामध्ये बारा बलुतेदारही आले. शेतीशी पूरक बाबींची पूर्तता करणाऱ्या समाजाची उपजीविका गाव पूर्ण करीत असे. विनिमयाचे माध्यम धान्य,श्रम असे. पोळा सणादिवशी बैलांना सजवून त्यांची पूजाकरून गावभर त्यांची मिरवणूक हा केवळ सोपस्कार नसून वर्षभर आपल्यासाठी अन्न देणाऱ्या श्रमशक्तीचा तो सन्मान आहे.

दसरा,दिवाळी, पाडवा हे सण तर पर्वणीच. आपले पंचांग निसर्गाशी अनुरूप आहे. भारतीय परंपरा या केवळ समारंभ, नसून तो जीवनशैलीचा भाग आहे. परस्पर संबंध दृढ करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा यातील गाभा असे.

मॉन्सून हा आपल्या देशाच्या समृद्धीचा पाया. मुबलक शेतजमीन,पशुधन ही आपली संसाधने आणि संपत्ती. याचे संरक्षण करणे आणि ते अबाधितपणे पुढील पिढीला हस्तांतरित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

आपली ईश्वर,भगवंताची व्याख्या म्हणजे पंचमहाभूते. आपल्याला वारश्यात मिळालेली अबाधित निसर्गसंपदा, नद्या, जैवविविधता,वनराई येत्या काळात जपणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत कायद्याचे टप्पे

१) लॉर्ड रिपन याने १८८२ मध्ये पहिल्या टप्यात काही सुधारणा आणल्या. कायदे, कोर्ट, कचेऱ्या सुरु झाल्या. १९१९ मध्ये प्रांतिक मंडळ अस्तित्वात आले. १९२० साली ग्रामपंचायत कायदा आणि१९३३ साली मुंबई ग्रामपंचायत कायदा अस्तित्वात आला.

स्त्रियांना मतदानाचे अधिकार देणे, करासाठी पंचायत अधिकारात वाढ, लोकल फंडातील काही भाग पंचायतीस देणे असे त्याचे स्वरूप होते.

२) स्वातंत्र्योत्तर काळात पंचायत राज व्यवस्थेत लोकसहभाग वाढावा, अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी बळवंतराय मेहता, अशोक मेहता, वसंतराव नाईक, बोंगीरवार,डॉ.पी.बी.पाटील इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली समित्यांनी अभ्यास करून सुधारणा सुचविल्या.

३) महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये जिल्ह्यास जिल्हा परिषद,तालुक्यास पंचायत समिती आणि गावस्तरावर ग्रामपंचायत असे तीन स्तर करण्यात आले.

४) २० एप्रिल १९९३ मध्ये पंचायतराज व्यवस्था आणि ग्रामसभा,ग्रामपंचायत यांना राज्य घटनेच्या २४३ ख कलमातील (७३ वी घटना दुरुस्ती) बदलाने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

५) कृषी,भूमिविकास(मृद् संवर्धन इत्यादी), पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि कुक्कुट विकास, मत्स्य व्यवसाय, लघु पाटबंधारे, पाणलोट विकास, सामाजिक वनीकरण,गौण वनोपज, पिण्याचे पाणी, ग्रामीण निवारा, शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण, महिला व बाल विकास, दारिद्र्य निर्मुलन असे एकूण २९ विषय ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या.

त्रिस्तरीय पंचायत राज प्रणालीः

१) ग्रामपंचायत

२) पंचायत समिती

३) जिल्हा परिषद

भविष्यातील आव्हाने आणि संधी

गावशिवाराची स्वच्छता, जलसंधारण, शिक्षण, शाश्वत शेती, आरोग्य आदी सोयींमुळे गावाचे स्वरूप पालटले आहे. स्वच्छतेचे गाव, पाणीदार गाव, वनसंपदेचे गाव, पुस्तकाचे गाव अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. हे चित्र दिसत असले तरी काही तुरळक राज्ये वगळता बहुतेक राज्यांनी सर्वच्या सर्व विषय अजूनही पंचायतीकडे हस्तांतरित केलेले नाहीत.

नगरपंचायती आणि मोठ्या ग्रामपंचायती कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण, रस्ते, जलसुरक्षा,नदी-नाले-ओढे यांच्यावरील अतिक्रमण या समस्यांनी विक्राळ स्वरूप धारण केले आहेत.

राज्यातील सुमारे ६० टक्के ग्रामपंचायती सातत्याने दुष्काळाच्या सावटाखाली असतात.त्यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुढील दशकात सुमारे ३० टक्के स्थलांतर शहराकडे होईल, असा अंदाज आहे.

आपल्याला ग्रामीण जीवनाचे संपूर्ण चक्र उलटे फिरविता येणार नाही. परंतु भविष्यातील समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन नियोजन केल्यास ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर नक्की कमी करता येईल. गावातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यास स्थलांतर थांबेल.

तेराव्या वित्त आयोगाने थेट करातील काही वाटा सुनिश्चित करून स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. तीन ते चार दशकांचे नियोजन करून रचनात्मक कामाची उभारणी केल्यास शाश्वत ग्रामविकासाचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल.

महत्त्वाचे मुद्दे

१) वाढती लोकसंख्या,स्थलांतरामुळे नागरी प्रशासनावरील ताण आणि समस्यांचा अभ्यासकरून आराखड्यांची गरज.

२) लोकसहभागातून जल,मृद संधारण,जलस्रोतांचे रक्षण,नद्यांचे पुनर्जीवन आणि शुद्धीकरण, रस्ते आणि दळणवळणाचे जाळे (दूरसंचार, इंटरनेट),अव्याहत वीज पुरवठा इत्यादी गोष्टींचे नियोजन महत्त्वाचे.

३) गुणवत्तापूर्ण कौशल्यावर आधारित शिक्षण, आरोग्य सुविधा, कृषी,पशुसंवर्धनासाठी पायाभूत सुविधा, शीत साखळी, गुणवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.

४) शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती विकास, व्यापार आणि समूह विकासाला चालना देण्याची गरज.

५) पारंपरिक बीज संवर्धनासाठी गावामध्ये बियाणे बॅंक, श्रम आणि वेळेच्या बचतीसाठी अवजारे बॅंकेची उभारणी.

६) स्थानिक साधनांचा वापर करून पर्यावरणपूरक घरांच्या बांधकामाची गरज.

७) अपारंपरिक ऊर्जेच्या वापरावर भर. सौर ऊर्जा, बायोगॅस वापरावर भर.

८) कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून विपणनाच्या नवनवीन संधी शोधणे,नवीन तंत्रज्ञानाचा कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात वापर करून उत्पादन वाढ शक्य. गावशिवारात स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी.

९) निसर्ग रक्षण, पर्यावरणाला हानी न पोचवता गावशिवाराची जैवविविधता अबाधित राखणे महत्त्वाचे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT