Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन जिल्हे मिळून पाच जिल्ह्यांतील २२ साखर कारखान्यांचे ऊस गाळप ६९ लाख टनांवर पोहोचले आहे. या ऊस गाळपातून सरासरी ७.७३ टक्के साखर उताऱ्याने ५४ लाख १ हजार ३४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तसेच खानदेशातील नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग घेतला आहे. यामध्ये १३ सहकारी, तर ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
१३ सहकारी साखर कारखान्यांनी १६ फेब्रुवारीपर्यंत २९ लाख ७१ हजार ८९५ टन उसाचे गाळप करत २२ लाख ६२ हजार ४३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.६१ टक्के राहिला. दुसरीकडे ९ खासगी कारखान्यांनी सरासरी ७.८२ टक्के साखर उताऱ्याने ४० लाख १३ हजार ६६१ टन उसाचे गाळप करत ३१ लाख ३८ हजार ९१० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
यंदा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यांत गाळपासाठी उसाचे सरासरी सुमारे १ लाख ४२ हजार ९०१ हेक्टर क्षेत्र उपलब्ध होते. तर, या क्षेत्रातून सरासरी ८०.५१ टन हेक्टरी उत्पादन गृहीत धरून किमान १ कोटी १५ लाख ५ हजार ४४० टन ऊस गाळपासाठी मिळण्याचा अंदाज होता. साधारणतः नोव्हेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळपासाठी कारखाने सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होती.
जिल्हानिहाय कारखाने ऊस गाळप व साखर उत्पादन
नंदुरबार : जिल्ह्यात एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी ७ लाख ८० हजार ५३ टन उसाचे गाळप केले. सरासरी ६.३१ टक्के साखर उताऱ्याने या दोन्ही कारखान्यांनी ४ लाख ९१ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जळगाव : जिल्ह्यात एका सहकारी साखर कारखान्याने १ लाख ९३६ टन उसाचे गाळप करत ९७ हजार ७७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्याचा सरासरी साखर उतारा ९.६९ टक्के इतका राहिला.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तीन सहकारी व चार खासगी मिळून सात कारखान्यांनी १५ लाख ५९ हजार ३४७ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.७ टक्के साखर उतारा राखत सातही कारखान्यांनी १५ लाख १३ हजार २५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जालना : जिल्ह्यातील दोन सहकारी व दोन खासगी मिळून चार कारखान्यांनी १६ लाख ७० हजार १५३ टन उसाचे गाळप केले. सरासरी ८.२१ टक्के साखर उतारा राखत या कारखान्यांनी १३ लाख ७१ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
बीड : जिल्ह्यातील सहा सहकारी व दोन खासगी मिळून आठ कारखान्यांनी २८ लाख ७५ हजार ६७ टन उसाचे गाळप केले. या काळापासून १९ लाख २७ हजार २३५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. या आठही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ६.७ टक्के इतका राहिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.