Latur News : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार हमी योजना विभाग काम करीत आहे. यासाठी येत्या काळात बांबू लागवड, फळबाग लागवड आणि पाणंद रस्ते कामांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी लोदगा (ता. औसा) येथे शुक्रवारी (ता. १४) आयोजित पर्यावरण योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रमात सांगितले. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, विभागीय वन अधिकारी अमित जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, कृषी उपसंचालक महेश क्षीरसागर, रोहयोचे गुणनियंत्रक राजेंद्र शहाडे, फिनिक्स फाऊंडेशनचे समन्वयक परवेज पाशा पटेल व संजय कर्पे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्री. गोगावले म्हणाले, की रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यावर आपला भर राहणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी लवकरच प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेण्याचे नियोजन आहे.
पाशा पटेल यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घेतला असून पर्यावरण रक्षण आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण करण्यासाठी बांबू लागवड फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात जास्तीत जास्त बांबू लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येतील. बांबू लागवडीतून पर्यावरण रक्षणाला मदत होणार असून यासाठी अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे.
सहकारमंत्री पाटील म्हणाले, की कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी लागवड उपयुक्त ठरणार आहे. जमिनीची धूप थांबविण्यासाठीही बांबू लागवड फायदेशीर ठरते. त्यामुळे ऊस लागवडीसोबतच बांबू लागवडीचा पर्याय निवडण्याची गरज आहे.
गरीब शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा स्रोत निर्माण होऊन त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी बांबू लागवड करण्याला प्रोत्साहन देण्याची गरज, असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले. श्री. पटेल यांनी बांबू लागवडीचे महत्त्व अधोरेखित करत येत्या काळात बांबूला चांगला दर मिळणार असल्याचे सांगितले.
यांचा झाला पर्यावरण योद्धा म्हणून सन्मान
बांबू लागवड करून पर्यावरण रक्षणाला हातभार लावणारे शेतकरी आणि त्यांना मार्गदर्शन, सहकार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा रोहयोमंत्री गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. यात उदगीर तालुक्यातील जकनाळ येथील अमोल मांडमुले, चिगळी येथील मनोहर पाटील, देवणी तालुक्यातील तळेगाव रतन कोनाळे, म्हाळंगी येथील शिवाजी एकवाड या शेतकऱ्यांसह शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आरी ग्रामपंचायत, कराडखेल ग्रामपंचायत, ढोणा ग्रामपंचायत, शिरूर अनंतपाळ पंचायत समिती, जळकोट पंचायत समिती, उदगीर पंचायत समिती, वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.