Water Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : अति उत्साहीपणा आला अंगलट

शेखर गायकवाड

Land Update : समाजात काही वेळेस अति उत्साह दाखविणारी माणसे असतात. पेपरमध्ये छोटी जरी बातमी आली तरी तिचा आपल्याला काय उपयोग होईल, हे शोधणारा एक नवा वर्ग उदयाला येतो आहे. आजची जी गोष्ट आहे ती अशाच एका माणसाची आहे. दत्ता नावाचा एक माणूस आयुष्यभर नवी काही गोष्ट आली की त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असे. एकदा त्याने पेपरमध्ये वाचले की सरकार गरिबांना घरे देणार आहे. लगेच तो त्या पेपरच्या बातमीचे कटिंग घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी तहसील कचेरीमध्ये शिरला.

सगळ्यांनी ऑफिसमध्ये त्यालाही सांगितले, की जरी घोषणा झाली असली तरी असा कोणताही शासन निर्णय आमच्याकडे आलेला नाही. त्यावर दत्ता प्रत्येक कारकुनाशी भांडला आणि ‘पेपरवाल्यांना काय वेड लागले लागले आहे काय? ते कशाला अशा बातम्या छापतील?’ अशी विचारणा करू लागला. शेवटी ऑफिसमधल्या नायब तहसीलदार यांनी त्याला समजावून सांगितले, की जोपर्यंत सरकारचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आमच्याशी भांडण करून काही फायदा नाही.

सरकार आता सर्व झोपडपट्ट्या काढून टाकून त्यांना पक्की घरे देणार, अशी बातमी वाचल्यावर पण चार-पाच ठिकाणी झोपड्या टाकायच्या का, असा पण विचार दत्ताने केला. दुसऱ्या दिवसापासून अशी जागा कोणत्या झोपडपट्टीत मिळू शकेल, याचा शोध घ्यायला त्याने सुरुवात केली.

वीस-पंचवीस झोपडपट्ट्यांमध्ये तो फिरला तरी सुद्धा त्याला अशी जागा काही मिळू शकली नाही. मुळात ज्या जागांवर झोपडपट्ट्या झाल्या होत्या त्या जागा त्या लोकांच्या मालकीच्या नव्हत्या. अशा जमिनींचे कागदपत्रे, सातबारा इत्यादी माहिती झोपडपट्टीधारक त्याला देण्याची काही शक्यता नव्हती.

असे दोन-तीन महिने काढल्यानंतर मग झोपडी टाकायचा नाद त्याने सोडून दिला. घरचे सुद्धा त्याला काही काम धंदा न करता बिनकामाचे उद्योग करतो, असे टोचून बोलत असत. पण दत्तावर त्याचा काही परिणाम झाला नाही.

तुम्हाला काही कळत नाही. अशीच हुशारी करून मी मोठा होणार असे तो उत्तर देत असे. एवढेच नाही तर तुम्ही दोन वर्षे कष्ट करून जेवढे पैसे कमावता त्यापेक्षा जास्त पैसे मला माझी एक जरी आयडिया यशस्वी झाली तर मिळतील, असे तो उत्तर देत असे.

एकदा त्याने पेपरमध्ये वाचले की एका नव्या धरणाचे काम सुरू होणार आहे, आणि धरणामध्ये पाच गावे बुडणार आहेत. तसेच लाभ क्षेत्रामध्ये आठ गावे असणार आहेत. त्यातल्या एखाद्या गावात जर जमीन आपण आताच घेतली तर स्वस्तात मिळेल. आणि पुढे ही जमीन बागायत झाल्यावर त्याची चार-पाच पट किंमत वाढेल, असा विचार दत्ताने केला. त्यानंतर ताबडतोब त्याने अशा जमिनी शोधायला सुरुवात केली. लोकांना सुद्धा धरण होणार याची माहिती होती. त्यामुळे लोकांनी सुद्धा किमती थोड्या वाढवूनच सांगितल्या. शेवटी एक माळरान जमीन ८० हजार रुपये एकर अशी दत्ताने ठरवली व तिचे फक्त रजिस्टर साठेखत केले.

साठेखत करताना त्याने केवळ २० हजार रुपये जमीन मालकाला दिले होते. जमीन मालक पण हुशार होता. त्याने तीन महिन्यांच्या आत जर तू खरेदीखत करून सगळे पैसे देऊ केले नाहीत, तर मी तुला खरेदीखत करून देणार नाही, असे सांगितले. पुढच्या तीन महिन्यांत कसलीच हालचाल झाली नाही. शेवटी त्याला राहिलेली सर्व रक्कम देऊन जमीन खरेदी करावी लागली. एकदा धरणाचे काम सुरू झाले की झपाट्याने जमिनीचे बाजार वाढतील असे त्याने घरच्यांना समजून सांगितले होते. पाच वर्षांत साधा जमिनींचा सर्व्हेसुद्धा सुरू झाला नाही.

पुढे तब्बल २५ वर्षांनंतर प्रत्यक्ष धरणाचे काम सुरू झाले. त्या वेळी बुडणारी गावे पण कमी झाली आणि लाभ क्षेत्रातील गावे पण कमी झाली होती. लोकांच्या विरोधामुळे सरकारने धरणाची जागासुद्धा थोडी खालच्या बाजूला घेतली होती. पाटबंधारे खात्याने जेव्हा कॅनॉलसाठी सर्व्हे करायला सुरुवात केली, त्या वेळी दत्ताने खरेदी केलेली जमीन ही कॅनॉलच्या वरच्या बाजूला येत असल्याचे स्पष्ट झाले.

२५ वर्षांनंतर दत्ताला मूळ जमीन मालकालाच ही जमीन विकावी लागली. ८० हजार रुपयाला घेतलेली जमीन २५ वर्षांनंतर एक लाख पंधरा हजाराला विकली तरी रुपयाचे अवमूल्यन विचारात घेता हा तोट्यातला व्यवहार ठरला होता. समाजात असे असंख्य अति उत्साही लोक असून, प्रत्यक्ष डोळ्यांवर विश्‍वास न ठेवता ऐकीव माहितीवर विश्‍वास ठेवून अति उत्साहीपणा दाखवला की अशा गोष्टी वाटायला येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation : अतिवृष्टी नुकसानीचे २२ कोटी ३३ लाख अनुदान

Crop Damage Compensation : पीक नुकसानीचे अनुदान आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर

APMC Election : आमदारकीच्या इच्छुकांची बाजार समितीत कसोटी

Soybean Crop Damage : अतिवृष्टीमुळे काढणी केलेल सोयाबीन पाण्यात

Rural Development : गट-तट विसरून गावे आदर्श करा

SCROLL FOR NEXT