Akole News : जागतिक आदिवासी दिनासह क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी दिनाच्या औचित्यावर आदिवासी कष्टकऱ्यांच्या रोजीरोटीला चालना देऊ शकेल असे अभियान राबवले जाणार आहे. यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने निर्णय घेतल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले आहे.
आदिवासी भागामध्ये बाळ हिरडा व हिरडा उत्पादन हे आदिवासी कष्टकऱ्यांच्या उत्पन्नाचे एक मुख्य साधन आहे. बाळ हिरडा व हिरड्याला रास्त भाव मिळावा यासाठी किसान सभा गेले अनेक वर्ष संघर्ष केला आहे. अद्यापही संघर्ष सुरूच आहे. याचमागणीसाठी मागील वर्षी जुन्नर, आंबेगाव व अकोले येथे किसान सभेच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आल्याचे नवले यांनी सांगितले आहे.
तसेच नाशिक येथील आयुक्त कार्यालयाच्या समोर देखील बेमुदत धरणे धरून राज्य सरकारचे आदिवास्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. याचाच परिणाम राज्य सरकारने मंत्रालयात बैठक घेऊन हिरड्याला हमीभाव जाहीर केला. या लढ्यामुळे काही प्रमाणात आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असेही नवले यांनी सांगितलं आहे.
तर आता राज्यातील आदिवासी समाजाच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने घेतला आहे. तर हिरडा हमीभावात वाढ, हिरडा पिकांची सात बारावर नोंद व्हावी, हिरडा झाडांची शेतात व वनांमध्ये लागवड करण्यासाठी उपक्रम हाती घेतला जाईल अशी माहिती नवले यांनी दिली आहे.
दरम्यान याआधी शेतकऱ्यांच्या बांधावरील हिरड्याची झाडांची नोंद सातबारावर नव्हती. त्यामुळे नुकसानीची भरपाई आदिवासी शेतकऱ्यांना मिळत नव्हती. मात्र आंबेगाव व जुन्नर तालुक्यामध्ये किसान सभेने पुढाकार घेऊन आंदोलन उभारले आणि येथील शेतकऱ्यांच्या बांधावरील हिरड्याची झाडांची नोंद सातबारावर झाली. त्यामुळेच २०१९ मध्ये आलेल्या चक्रीवादळात झालेल्या हिरडा झाडांची नुकसान भरपाई मिळाली. तेही लढा देऊनच मिळवावी लागल्याचे नवले यांनी सांगितले. याचपद्धतीने अकोले तालुक्यात सुद्धा मागील वर्षी हिरड्याच्या झाडांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी किसान सभेने मोहीम हाती घेतली. यासाठी बेमुदत धरणे धरणे करण्यात आले. याचाच परिणाम आज तालुक्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे हिरडा झाडाच्या नोंदी झाल्या आहेत. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात अशा नोंदी होणे बाकी असल्याचे नवले यांनी सांगितले.
याच नोंदी सातबारावर करण्यासाठी ९ ऑगस्टपासून किसान सभेच्या वतीने तालुक्यात व्यापक अभियान राबवण्यात येणार आहे. हिरडा नोंदणीचे निशुल्क अर्ज किसान सभेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच गावोगावी जाऊन शेतकऱ्यांकडून अर्ज किसान सभेचे कार्यकर्ते भरून घेऊन घेतील. त्यानंतर मागील वर्षीप्रमाणेच यंदाही भरलेले अर्ज मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयामार्फत नोंद करून घेतले जातील. याची सुरूवात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वसंत मार्केट येथील कार्यालयातून होणार असून यावेळी ऑगस्ट दिनी व क्रांती दिन क्रांतिकारकांना अभिवादन केले जाईल असेही नवले यांनी सांगितले आहे.
काय असेल अभियान?
९ ऑगस्टपासून किसान सभेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यात आदिवासी समाजाच्या उत्पादनाची साधने सुरक्षित रहावी, आदिवासी कष्टकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, घटनेने दिलेल्या आरक्षणासह त्यांच्या सर्व अधिकारांचे रक्षण व्हावे या गोष्टींचा समावेश असणार आहे. तसेच वन विभागाने आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरड्याची झाडे लावावीत, नवीन हिरडा जातीचे संशोधन करून अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती कृषी विद्यापीठ व वन विभागाने विकसित कराव्यात, हिरड्याला रास्त बाजारपेठ मिळेल यासाठी सरकारने प्रयत्न करावेत व यातून आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन मजबूत व्हावे यासाठी किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रयत्न करणार असल्याची माहिती नवले यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.