Pune News: महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि विधान परिषदेत मोबाइलवर रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी त्यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. कोकाटे यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी उल्लेखनीय काम केल आहे असे या संघटनाचे म्हणणे आहे.५२ शासकीय निर्णय, बदल्यांचे विकेंद्रीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे कौतुक संघटनांनी केले आहे. मात्र, वेळोवेळी झालेल्या वादांमुळे कृषिमंत्र्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार कायमच आहे.
कोकाटे यांनी वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली होती, त्यात "शेतकरी पीक विम्याच्या पैशांचा उपयोग साखरपुडा किंवा लग्नासाठी करतात, शेतीत गुंतवणूक करत नाहीत. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो. शेतात पिकेच नसतील तर ढेकळांचे पंचनामे करायचे का?" या वक्तव्यांचा समावेश होता.
यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यातच विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण अशा परिस्थितीतही कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने एका निवेदनात कोकाटे यांच्या कार्याच कौतुक केल. त्यांनी सांगितले की, कोकाटे यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक धाडसी आणि दूरगामी निर्णय घेतले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतीची पाहणी केली, कृषी विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांना भेटी दिल्या, तसेच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला.
त्यांनी अवघ्या काही काळात ५२ शासकीय निर्णय घेऊन कृषी विभागाच्या कामाला गती दिली आहे. याशिवाय, त्यांनी बदल्यांचे विकेंद्रीकरण केले आणि कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. "आम्ही या सर्व कामांचे साक्षीदार आहोत आणि आम्हाला त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे," असे संघटनांनी निवेदनात म्हटले आहे.
कोकाटे यांनी कृषी सहाय्यकांच्या बारा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदनाम बदलाच्या मागणीला पूर्ण केले. त्यांनी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून 'सहाय्यक कृषी अधिकारी' असे केले, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढला. याशिवाय, शेतकऱ्यांना जलद सेवा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, अॅग्रीस्टॅक, कृषी समृद्धी योजना आणि साथी पोर्टल यांसारख्या योजनांना गती देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच, कृषी विभागात सुधारणा करण्यासाठी सारंगी समितीची स्थापना केली. या सर्व निर्णयांमुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्राला चांगला फायदा झाला आहे.
या सर्व घडामोडींमुळे कोकाटे यांच्यावरील वाद कमी होण्याची शक्यता आहे का, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना सक्रिय पाठिंबा देत आहेत, हे दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.