Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : दोन बहरांतील १७ फळपिकांना विमा संरक्षण

बाळासाहेब पाटील

Mumbai News : अवकाळी, अवेळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी फळपीक विमा योजनेंतर्गत मृग बहरातील आठ आणि आंबिया बहारातील नऊ फळपिकांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही योजना अनुक्रमे २६ आणि ३० जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. यात गारपिटीसह प्रतिहेक्टर विमा संरक्षणाची रक्कम निश्चित केली आहे.

मृग बहरातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष तर आंबिया बहरातील संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष तर प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी आणि पपई या फळपिकांचा समावेश केला आहे. महसूल मंडळ हा घटक धरून ही योजना पुढील दोन वर्षांसाठी राबविण्यात येईल.

विमा संरक्षण हे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू असेल. विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबागांच्या लागवडीस विमा संरक्षण नसेल. आंबा, चिकू, काजू पाच वर्षे, लिंबू चार वर्षे, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू तीन तर द्राक्ष आणि डाळिंबासाठी दोन वर्षे वयाची बाग पात्र असेल.

या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे विमा हप्ता अनुदान ३० टक्के असून ३० टक्क्यांवरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा आहे. यामध्ये राज्य सरकार ५ टक्के विमा हप्ता दायित्व घेणार असून ३५ टक्क्यांवरील हप्ता शेतकरी व सरकार ५० -५० टक्के भरेल. संत्र्यासाठी १५ जून ते १५ जुलै कमी पाऊस, १६ जुलै ते १५ ऑगस्ट पावसाचा खंड हा विमा संरक्षण कालावधी आहे. यासाठी एक लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे.

मोसंबीसाठी १ जुलै ते ३१ जुलै कमी पाऊस, १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पावसाचा खंड असल्यास एक लाखांचे विमा संरक्षण, पेरूसाठी १५ जून ते १४ जून कमी पाऊस, १५ जुलै ते १५ ऑगस्ट पावसाचा खंड असल्यास ७० हजार विमा संरक्षण, चिकूसाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर हा जादा आर्द्रता आणि जास्त पावसाचा कालावधी असल्यास ७० हजार,

डाळिंबासाठी १५ जुलै ते १५ ऑक्टोंबर हा पावसाचा खंड, १६ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर हा जास्त पावसाचा कालावधी असल्यास एक लाख ६० हजार, लिंबूसाठी १५ जून ते १५ जुलै कमी पाऊस आणि १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड असल्यास ८० हजार सीताफळासाठी १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर हा पावसाचा खंड आणि १ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर जास्त पाऊस असल्यास ७० हजार, द्राक्षांसाठी १५ जून ते १५ नोव्हेंबरदरम्यान पाऊस, आर्द्रता व किमान तापमान आदी बाबींसाठी ३ लाख ८० हजार रुपयांचे प्रतिहेक्टर विमा संरक्षण असेल.

मृग बहारासाठी विमा संरक्षण कालावधी

संत्रा : १ डिसेंबर ते १५ जानेवारी अवेळी पाऊस, १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी कमी तापमान, १ मार्च ते ३१ मे जादा तापमान १ लाख तर गारपीट झाल्यास ३३ हजारांचे विमा संरक्षण

मोसंबी : १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर अवेळी पाऊस, १ मार्च ते ३१ मार्च जास्त तापमान, १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर जास्त पाऊस असल्यास एक लाख तर गारपीट झाल्यास ३३ हजारांचे विमा संरक्षण.

डाळिंब : १५ जानेवारी ते ३१ मे अवेळी पाऊस, १ एप्रिल ते ३१ मे जादा तापमान, १ जून ते ३१ जुलै जास्त पाऊस असल्यास १ लाख ६० हजार आणि गारपीट झाल्यास ५३ हजारांचे विमा संरक्षण.

काजू : १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी अवेळी पाऊस, १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी कमी तापमान असल्यास १ लाख २० हजार तर गारपिटीसाठी ४० हजारांचे विमा संरक्षण

केळी : १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी कमी तापमान, १ मार्च ते ३१ जुलै वेगाचा वारा तर १ एप्रिल ते ३१ मे जादा तापमान असल्यास १ लाख ७० हजार तर गारपीट झाल्यास ५७ हजारांचे विमा संरक्षण

द्राक्ष : १६ ऑक्टोंबर ते ३० एप्रिल अवेळी पाऊस, १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दैनंदिन कमी तापमान असल्यास ३ लाख ८० हजार तर गारपीट झाल्यास एक लाख २७ हजारांचे विमा संरक्षण.

आंबा (कोकण) : १ डिसेंबर ते १५ मे अवेळी पाऊस, १ जानेवारी ते १० मार्च कमी तापमान, १ मार्च ते १५ मे जास्त तापमान, १६ एप्रिल ते १५ मे वेगाचा वारा असल्यास १ लाख ७० हजार तर गारपीट झाल्यास ५७ हजार रुपये विमा संरक्षण.

आंबा (इतर जिल्हे) : १ जानेवारी ते ३१ मे अवेळी पाऊस, १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी कमी तापमान, १ मार्च ते ३१ मार्च जास्त तापमान, १ एप्रिल ते ३१ मे वेगाचा वारा असल्यास १ लाख ५०हजार तर गारपीट झाल्यास ५७ हजार रुपये विमा संरक्षण

स्ट्रॉबेरी : १ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर अवेळी पाऊस व सापेक्ष आर्द्रता, १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल अवेळी पाऊस, सापेक्ष आर्द्रता व जास्त तापमान, १ डिसेंबर ते ३१ मार्च कमी तापमान असल्यास २ लाख ४० हजार तर गारपीट झाल्यास ८० हजार रुपये विमा संरक्षण.

पपई : १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी कमी तापमान, १ फ्रेब्रुवारी ते ३० जून वेगाचा वारा, १५ जून ते ३० सप्टेंबर जास्त पाऊस व आर्द्रता असल्यास ४० हजार तर गारपीट झाल्यास १३ हजार रुपयांचे विमा संरक्षण असेल.

हवामान धोक्याचे मोजमाप

ज्या फळपिकांमध्ये जादा व कमी तापमान या हवामान धोक्याचा कालावधी सलग तीन व त्यापेक्षा जास्त दिवस आहे, अशा फळपिकांसाठी सलग दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी जादा तापमानासाठी ०.५ डिग्री से. इतकी तर कमी व कमी तापमानासाठी ०.५ डिग्री से. इतकी जास्त तफावत नुकसानभरपाईसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT