Cotton Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop Damage : कापसाच्या नुकसानीकडे विमा कंपनीची डोळेझाक

Crop Insurance : परतीचा पाऊस निघून गेला असला तरी मॉन्सूनोत्तर पावसाने चार-पाच दिवसांपासून दाणादाण उडवली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : परतीचा पाऊस निघून गेला असला तरी मॉन्सूनोत्तर पावसाने चार-पाच दिवसांपासून दाणादाण उडवली आहे. दररोज होणाऱ्या पावसामुळे कापसांसह अन्य पिकांचे नुकसान सुरू असून शेतकरी नुकसान झाल्याबाबत पीकविमा कंपनीला तक्रारी करत असताना त्याकडे कंपनीकडून डोळेझाक होत असल्याचे शेतकऱ्‍यांचे म्हणणे आहे.

नुकसान झाल्याबाबत कळवल्यावर विमा कंपनीचा प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष पाहणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकरी सांगतात. अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाची पिके चांगली आली आहेत. कापूस वेचणीला आला असतानाच पाऊस झाल्याने फुटलेल्या कापसाला बाधा निर्माण झाली आहे. बोंडाबाहेर आलेला कापूस पावसाने काळा पडला आहे.

त्यामुळे दरात फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा पावसाची स्थिती सुरुवातीपासून चांगली असल्याने लवकर लागवड झाली. त्यामुळे आता कापूस वेचणीला आला आहे. मागील आठ दिवसांत अनेक भागांत अचानक पाऊस झाला. त्या पावसाने बोंडातून फुटलेला कापूस काळा पडला आहे. त्यामुळे पहिल्याच वेचणीच्या कापसाला दरात फटका सोसावा लागण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

झालेल्या नुकसानीबाबत अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीला तसेच कृषी विभागाला कळवले आहे. मात्र विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून पावसाने झालेल्या कापूस व अन्य पिकांच्या नुकसानीकडे डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. नुकसान झाल्याबाबत कळवल्यावर तातडीने स्थळ पाहणी, पंचनामे करणे गरजेचे असताना नुकसान झाल्याचे कळवून पंधरा दिवस झाले तरी अजूनही कोणी शेतात फिरकले नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सोमवारी अनेक भागांत पाऊस

अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत सोमवारी (ता. २१) सकाळी दहा ते बारा या काळात अनेक भागात जोरदार मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. शहर, राहुरी, नेवासा, कोपरगाव, नगर तालुक्यांतील अनेक गावांत पाथर्डी, शेवगाव भागातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली. परतीचा पाऊस गेला असला तरी गेल्या पाच दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पाऊस सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सतच्या पावसाने कापसाचे नुकसान झाले. त्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी विमा कंपनीला कळवले. मात्र विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. जर पावसाने पिकांचे नुकसान झाले तर विमा कंपनी, कृषी विभागाकडून दखल घेणे गरजेचे असताना हे लोक शेतात फिरकलेही नाहीत.
- बाबासाहेब म्हसे, कापूस उत्पादक, कोंढवड, ता. राहुरी, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Seed : कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाचा ३८ हजार हेक्टरला फटका

Crop Damage : आभाळच फाटलंय, सांगा कसं जगायचं?

Ahilyanagar Assembly Constituency : अहिल्यानगरला भाजपची जुन्या शिलेदारांवरच मदार

SCROLL FOR NEXT