Pune News : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची होत आहेत. त्यामुळे या योजनेची संपूर्ण चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन गागरे यांनी विभागीय आयुक्त, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आदींना पाठविले आहे.
आदिवासी भागातील अनेक गावांतून जलजीवन मिशनचे काम ठप्प झालेले आहे. देवळे, खटकाळे, निमगिरी व इतर पाच ते सहा ठिकाणी एकच ठेकेदार काम करत असून संबंधित ठेकेदार अत्यंत बेजबाबदार असल्याचे गेल्या दोन वर्षात दिसून आले आहे. दोन वर्षे होऊन देखील कामे पूर्ण झाली नाहीत.
खटकाळे येथे सुमारे ४० टक्के काम पूर्ण करून टाकीचे कामाचे फक्त भूमीपूजन केले आहे. गेल्या वर्षात येथे कोणतेही काम केलेले नाही. योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याच्या गटारांमधून खोदकाम केले आहे, ते देखील दीड ते दोन फूट खाली केलेले नाही. रस्त्याची साइडपट्टी व गटारे काढताना बऱ्याच ठिकाणी यावर्षी पाइपलाइन तुटली आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने बऱ्याच ठिकाणी पाइप लाईन साईडपट्टीच्या खाली व गटारामध्ये जाणार आहे.
योजनेच्या माणिकडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रात नदीजवळ खोदलेल्या विहिरी नदीने वाहून आणलेल्या गाळ, दगड-मातीने भरून गेल्या आहेत. विहिरी धरणाच्या पाणी साठ्याच्या मधोमध घेतल्यामुळे सहा से आठ महिने विहिरी धरणाच्या पाण्याखाली राहणार आहेत.
यामुळे भविष्यात मोटार बिघडली, बंद झाली तर पुन्हा धरणाचे पाणी खाली गेल्या शिवाय दुरुस्त करता येणार नाही, ही सर्वात मोठी अडचण आहे. ठेकेदाराने बऱ्याच ठिकाणी पाइप निकृष्ट दर्जेचे वापरले आहेत. यामुळे कामाची तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.