Mumbai News : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये रविवारी (ता. ११) तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक करार करण्यात आला. सुमारे १९,२४४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील जळगाव, अकोला, अमरावती आणि बुलडाणा या खारपाण पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भोपाळ येथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तुलसीराम सिलावट, कुंवर विजय शाह आणि दोन्ही राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘आजचा दिवस महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी ऐतिहासिक आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचा संकल्प आम्ही यापूर्वीच केला होता. आज दोन्ही राज्यांनी यावर सहमती दर्शवत सामंजस्य करार केला.
यापूर्वी २००० मध्ये दोन्ही राज्यांची बैठक झाली होती, त्यानंतर आता २०२५ मध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र, या प्रकल्पाबाबत दोन्ही राज्ये सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आंतरराज्य जल करारांना गती देण्याचे निर्देश दिल्यानंतर २०१६ पासून या प्रकल्पाला अधिक गती मिळाली.’
ते म्हणाले, ‘तापी मेगा रिचार्ज हा जगातील एक अद्भुत प्रकल्प ठरेल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील २ लाख ३४ हजार ७०६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, तर मध्य प्रदेशातील १ लाख २३ हजार ०८२ हेक्टर जमिनीला लाभ होईल. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा प्रकल्प केंद्र सरकारद्वारे राष्ट्रीय योजना म्हणून स्वीकारला जावा, यासाठी आम्ही दोन्ही मुख्यमंत्री लवकरच पुन्हा केंद्राकडे विनंती करणार आहोत.’ या बैठकीत महाराष्ट्राच्या डांगुर्ली बॅरेज आणि जामघाट यांसारख्या प्रकल्पांवरही चर्चा झाली. जामघाट प्रकल्पासाठी २८ वर्षांपूर्वी आपण मध्य प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमवेत आलो होतो. या जामघाट प्रकल्पामुळे नागपूरच्या पुढील ३०-४० वर्षांच्या पाण्याची गरज पूर्ण होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
असा आहे तापी मेगा रिचार्ज प्रकल्प
धरण : मध्य प्रदेशातील खरिया गुटी घाट येथे तापी नदीवर धरण उभारले जाईल
एकूण सिंचनाखालील क्षेत्र : ३,५७,७८८ हेक्टर
महाराष्ट्राला लाभ : २,३४,७०६ हेक्टर (सुमारे ५.७८ लाख एकर) जळगाव, अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांना फायदा
एकूण पाणी वापर: ३१.१३ टीएमसी
महाराष्ट्र : १९.३७ टीएमसी
मध्य प्रदेश: ११.७६ टीएमसी
योजनेची अंदाजित किंमत : १९ हजार २४४ कोटी रुपये (२०२२-२३ च्या किमतीनुसार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.