Pune News : विदर्भात गारपीट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंगळवारी (ता. ९) संत्रा बागांसह भाजीपाला व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पश्चिम विदर्भातही अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत वादळी पाऊस व गारपिटीने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यांत आंब्यांची मोठी गळ झाली तर ज्वारी पीक जमीनदोस्त झाले आहे. तसेच भुईमूग, फरदड कापूस, हळद, टरबूज आदी फळपिकासंह भाजीपाल्याची मोठी हानी झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता पिकांच्या पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे.
अमरावती जिल्ह्यात संत्रा बागांसह भाजीपाला व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गारपीट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे प्राथमिक सर्व्हेक्षणात १२ हजार २७८ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसामुळे रब्बी गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. दिग्रस, पुसद, यवतमाळ या तालुक्यांमध्ये पाऊस झाला.
मराठवाड्यात परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ५४ मंडलांत बुधवारी (ता. १०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला.
त्यामुळे रब्बी ज्वारी, गहू, उन्हाळी भुईमूग, फरदड कापूस, हळद, आंबा, टरबूज आदी फळपिकासंह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. नांदेडला मंगळवारी (ता. ९) सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
हा पाऊस नांदेड, अर्धापूर, कंधार, लोहा, भोकर, हदगाव, किनवट व नायगाव तालुक्यांत झाला. लोहा तालुक्यात वीज पडून तीन जनावरे दगावली. तसेच पिकांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर व तालुक्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
जोराच्या वाऱ्यात आंबे पडून मोठे नुकसान झाले आहे. मात्र खोडवा उसाला हा पाऊस फायदेशीर ठरणारा आहे. परळी, माजलगाव तालुक्यांतही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागली. धाराशिव जिल्ह्यात तुरोरी, उमरगा, अणदूर परिसरात हलका पाऊस झाला.
पश्चिम विदर्भात पावसाचा धुमाकूळ
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) सायंकाळी अवकाळी पाऊस, वादळ तसेच काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस, तर तेल्हारा, अकोट, पातूर, बाळापूर व मूर्तिजापूर तालुक्यांना वादळाचा फटका बसला. जिल्ह्यात उन्हाळी हंगामात ज्वारीची लागवड झाली असून, हे पीक जमीनदोस्त झाले. बाळापूर तालुक्यात लिंबू बागांमध्ये नुकसान झाले. शिवाय गहू, ज्वारी, कांदा, तीळ पिकांचेही नुकसान झाले.
वरुड, मोर्शीत संत्र्याची ९० टक्के गळ
अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागात राज्यातील एकूण दीड लाख हेक्टर संत्रा लागवडीपैकी सुमारे ७० हजार हेक्टर लागवड आहे. आंबिया बहाराची फळे सध्या बोर आणि लिंबाच्या आकाराची आहेत.
त्याची ९० टक्के गळ झाल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसरात कांदा जमिनीवरच सडला आहे. संत्रा फळांना गारपिटीचा तडाखा बसल्याने ही फळे काळी पडत गळत असल्याने हा हंगामही गमावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.