Kolhapur News : ‘‘केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंधने आणलेली असतानाच तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीही साखर कारखान्यांना आता ‘सी हेवी मोलॅसीस’पासून इथेनॉल निर्मितीबाबतची पडताळणी करावी,’’ अशा सूचना केल्या आहेत. मुळातच, या घटकापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर सर्वात कमी आहे. त्यामुळे कंपन्यांच्या या सूचनेवरून साखर उद्योग नाराज आहे.
‘सी हेवी मोलॅसिस’ निर्यात न करता कारखान्यांनी त्यापासून इथेनॉल तयार करावे, जेणेकरून सध्याच्या निर्बंधामुळे होणारा इथेनॉलचा तुटवडा कमी होऊ शकेल, असे कंपन्यांनी म्हटले आहे.
केंद्राने उसाचा रस, सिरप, व साखरेपासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी आणली आहे. आठवड्यापूर्वी हा निर्णय झाल्यानंतर साखर उद्योग विविध चर्चांनी ढवळून निघाला आहे. अनाकलनीय निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे.
केंद्राने भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता इथेनॉलचे खरेदीदार असणाऱ्या तेल उत्पादक कंपन्यांनी कारखान्यांनी कोणत्या पदार्थांपासून इथेनॉल तयार करावे, या बाबत साखर उद्योगाला सूचना दिल्या आहेत. सध्याचे करार संपल्यानंतर कारखान्यांनी सी हेवी मोलॅसिसचे रूपांतर इथेनॉल पर्यायावर विचार करण्याचेही सुचविले आहे.
यंदा जानेवारीनंतर ऊस उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे अंतिम टप्प्यात या राज्यातील साखर निर्मिती पुन्हा कमी होईल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यांनी ‘सी हेवी मोलॅसिस’चा वापर इथेनॉलसाठी करावा, अशी सूचना तेल कंपन्यांनी केल्या आहेत.
केंद्रापुढे केवळ साखरेची उपलब्धता व दर नियंत्रण या दोन बाबी प्राधान्याने महत्त्वाच्या आहे. त्यामुळे केंद्र या दृष्टीने प्रयत्न करत आहे. ही बाब कारखान्यांनी लक्षात घेऊन इथेनॉल निर्मिती करावी, असे तेल कंपन्यांनी म्हटले आहे.
उफराट्या सूचना
उसाचा रस, सिरप, व साखरेपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक किंमत मिळते. तर ‘सी हेवी मोलॅसिस’पासून मिळणाऱ्या इथेनॉलला सर्वांत कमी दर मिळतो. अशा प्रकारे इथेनॉल तयार करा, अशा सूचना करा म्हणणे बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था इथेनॉल प्रकल्पांची होईल, अशी भीती साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. इथेनॉलची तूट भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांनीच जादा दर इथेनॉलला दिल्यास त्याचा थोडाफार फायदा इथेनॉल प्रकल्पांना होईल, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
निर्बंधाचा फेरविचार ?
राज्य, केंद्र पातळीवरील साखर उद्योगातील संघटनांकडून केंद्राचा इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधाचा निर्णय कसा चुकीचा आहे, याचा उद्योगाला किती फटका बसणार आहे, या बाबी सचिव स्तरावर पटवून देण्यात येत आहेत. साखर उद्योगातील दिग्गजांनीही या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.