Beed News : शेतकरी महिलांच्या उद्योगाला समाजात मान्यता मिळत आहे. केंद्र शासन जमिनीच्या आरोग्यासाठी सजग आहे. शासन आणि शेतकरी यांच्यातील सुसंवादाने कृषीच्या विकासाची गती दृढ होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याने शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याची गरज असल्याचे मत राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केले.
दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. गोपछडे बोलत होते.
अध्यक्षस्थानी दीनदयाल शोध संस्थान बीड प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी, मंचावर कृषी हवामानशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. प्रल्हाद जायभाये, अंबाजोगाईचे उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या संध्या कुलकर्णी व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक डॉ. देशमुख यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राने निर्मिती केलेल्या ‘नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन : वीज कोसळणे’ या घडी पत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ब्युटी पार्लर विषयांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच ऑनलाइन मार्केटिंगच्या माध्यमातून आपली उत्पादने विकणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्क महिला उद्योजकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
खासदार गोपछडे म्हणाले, ‘‘देशाच्या पंतप्रधानांना मराठवाड्यासाठी हवामान केंद्र व आयसीआरची शाखा मराठवाड्यात असावी यासाठी मागणी केली होती; त्यापैकी पंतप्रधानांनी तत्काळ एक डॉफ्लर रडार मराठवाड्याला दिले आहे. पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांची सहल दिल्लीला काढून देशाचा कारभार कसा चालतो याची माहिती त्यांना देणार आहे.’’ डॉ. जायभाये, उपविभागीय कृषी अधिकारी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, की विविध १७ राज्यांत वेगवेगळे ५० पदार्थ एक वर्षापासून विकले जात आहेत. दररोज ८ ते १२ हजार रुपयांच्या ऑर्डर प्राप्त होत आहेत. हवामानबदल वास्तव असल्याने शेतीला पूरक उत्पन्नाची जोड देणे आवश्यक आहे. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन कृषीविद्या शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी केले. आभार गृह विज्ञान शास्त्रज्ञ रोहिणी भरड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
११ शेतकऱ्यांचा सन्मान
या वेळी बीड जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ११ शेतकऱ्यांचा ‘राष्ट्रऋषी नानाजी देशमुख आदर्श शेतकरी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सारिका व यशवंत देशमुख (गाडे पिंपळगाव, परळी), पूजा रोहित हजारे (लोखंडी सावरगाव, अंबाजोगाई), चंद्रशेखर व्यंकटराव कासले (धानोरा खुर्द अंबाजोगाई), शिवराज व छाया फाटे (नित्रुड, माजलगाव), शीला महादेव कुरवडे (कोल्हेवाडी, केज), कल्याणी चंद्रप्रकाश मिटकरी (दौनापूर, परळी), बालाजी बाजीराव तट (आपेगाव, अंबाजोगाई), हनुमंत विश्वनाथ भोसले (औरंगपूर, केज), संतोष गोरखनाथ बादाडे (नित्रुड, माजलगाव), अरविंद सुधाकर आघाव (दौनापूर परळी) व दीपाली सतीश बेद्रे (युसूफ वडगाव, केज) या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.