Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Telangana Onion Rate : ‘बीआरएस’च्या कांदेदराबाबत दाव्याची शेतकऱ्याकडून पोलखोल

Team Agrowon

Nashik News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या ‘बीआरएस’ (भारत राष्ट्र समिती) पक्षाने शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घालून राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. या मुद्द्यावरून मराठवाड्यात पक्षाच्या अनेक सभा गाजल्या.

‘अबकी बार, किसान सरकार’अशी घोषणा दिली. दरम्यान, कांद्याला भाव नसल्याने कन्नड-सोयगावचे माजी आमदार ‘बीआरएस’चे राज्यातील नेते हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

तेलंगणामध्ये महाराष्ट्रापेक्षा कांद्याला अधिक दर मिळतो असा दावा जाधव यांनी केला होता. त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेऊन पुणतांबा (ता. राहाता, जि. नगर) येथील शेतकरी योगेश वाणी यांनी हैदराबाद मार्केटमध्ये नेला.

तेथे गेल्यानंतर कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यामागचे वास्तव समजल्यानंतर वाणी यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणातील बाजारपेठेत कांदा नेऊन विकावा, असे आवाहनही केले होते. मात्र जाधव यांचा दावा योगेश वाणी यांनी खोडला आहे.

वाणी हे व्हिडिओमध्ये सांगत आहेत, की मी ५०० गोणी कांदा हैदराबाद मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला होता. जाधव यांच्या सांगण्यानुसार हैदराबाद बाजारात १८०० ते २१००रुपये असा प्रतिक्विंटल दर कांद्याला दिल्याचे सांगण्यात आले होते. येथे आल्यानंतर कांद्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

येथे कांदा आणण्यासाठी सुमारे तीन रुपये प्रति किलो वाहतूक खर्च झाला. येथे ६ टक्के आडत घेतली जाते. सर्व खर्च जाऊन ६०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. मात्र महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.’’ याबाबत जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कार्यालयाने प्रतिसाद दिला नाही.

‘ही तर राजकीय हेतूने बदनामी...’

शेतकऱ्यांनी केलेला आरोप खोडण्यासाठी हर्षवर्धन जाधव हे स्वतः हैदराबाद बाजार समितीत गेले असून, त्यांनी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. राजकीय हेतूने खोटी माहिती देऊन केवळ बदनामीपोटी अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ बनवून नागरिकांमध्ये एक विरोधाची भूमिका निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचे ‘बीआरएस’च्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

‘हैदराबादला गेलेल्या शेतकऱ्यांची फजिती’

मुंबई : ‘‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तेलंगणा सरकारकडून दिशाभूल केली जात आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ‘‘काही शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून हैदराबादला कांदा नेला. तेव्हा त्यांची काय फजिती झाली, हे त्यांच्याशी बोलल्यानंतर कळाले.

‘बीआरएस’ राजकीयदृष्ट्या आपण वेगळे काहीतरी करत आहे, असे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. या पलीकडे काही नाही. ‘बीआरएस’ला महाराष्ट्रात प्रतिसाद मिळेल की नाही, हे भविष्यात कळेल,’’ असेही ते म्हणाले.

बीआरएस ही भाजपची बी टीम ः नाना पटोले

मुंबई : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहीत आहे.

तेलंगणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. दादरमधील टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी टीका केली.

आम्हाला राजकारण करायचे नाही; मात्र कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. दोन पैसे मिळतील म्हणून आम्ही विश्वास ठेवला. मात्र त्यात खर्च करूनही फसलो. राजकीय नेत्यांनी खोटे आश्वासने देऊ नये तसेच शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये.
योगेश वाणी, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT