Union Budget 2024 News : भाजप सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प गुरुवारी (ता.१) संसदेत सादर करण्यात आला. "मागील दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं सकारत्मक झेप घेतली. युवा, गरीब, शेतकरी आणि महिलाच्या विकासासाठी सरकार काम करत आहे.
देशात १ हजार ३६१ इलेक्ट्रॉनिक बाजार समिती उभारल्या गेल्या. केंद्र सरकारच्या शेतकरी केंद्री धोरणामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळाली. आपत्ती व्यवस्थापन आणि शेतमालाच्या किंमती हमी, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्टार्टअपमुळे शेतकऱ्यांचा विकास घडवून आला," असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन केले तेव्हापासून अर्थव्यवस्था सुधारली. गेल्या दहा वर्षात आत्मनिर्भर भारतासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले आहे. त्या कामाच्या भरोसावर आम्हाला पुन्हा एकदा जनता निवडून देईल, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. त्या अर्थसंकल्प सादर करताना बोलत होत्या.
शेतकरी, गरीब, महिला आणि युवा या घटकांच्या विकासासाठी सरकार काम करतं. २५ कोटी लोकं गरीब मुक्त झाले. पीएम किसान सन्मान निधी योजनेतून ११.८ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला. तसेच ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा ४ कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला, असंही सितारामन म्हणाल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (ता.१) संसदेत २०२४-२५ चा अर्थसंकल्प मांडला. देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला.