Farm Pond Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pond : संरक्षण उपायांअभावी शेततळी बनताहेत मृत्यूचा डोह

Team Agrowon

Pune News : राज्यात कृषी खात्याच्या अनुदानातून उभारल्या जाणाऱ्या शेततळ्यांमध्ये सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे शेततळी म्हणजे मृत्यूचे डोह बनले आहेत. याच महिन्यात तळ्यात पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

शेततळ्यांमध्ये पडून मृत्यू होण्याची मालिका गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्याबाबत जुन्नरच्या ‘सह्याद्री’ गिरीभ्रमण संस्थेने सर्वप्रथम आवाज उठवला.

संस्थेचे माजी अध्यक्ष संजय रमेश खत्री व सचिव धनंजय काशिनाथ कुलकर्णी यांनी तत्कालीन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. कृषी खात्याने कडक नियमावली लागू न केल्यास शेततळ्यांचे बळी वाढतील, असा इशाराही दिला होता. परंतु, आयुक्त कार्यालयाने या गंभीर विषयावरील पत्राला केराची टोपली दाखवली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

९ मे २०२२ रोजी सोलापूरच्या शेटफळमध्ये शेततळ्याने तीन मुलांचा बळी घेतला होता. त्यानंतर पाचोरे वणी (ता.निफाड) येथे एकाचा तर डिसेंबरमध्ये येवल्यातील निमगाव मढ येथे कांदा लागवड करताना एकाचा तळ्यात पडून मृत्यू झाला आहे. मृत्यूची मालिका यावर्षीही चालू आहे. या महिन्यात करकंब (जि. सोलापूर) येथे शेततळ्यात पडून तीन शाळकरी मुले मरण पावली. हिरवे तर्फे नारायणगाव (जि.पुणे) येथे रविवारी (ता. २८) शेततळ्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला.

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तळ्यांच्या सुरक्षित वापराकडे कृषी खात्याने दुर्लक्ष केल्याचे म्हणता येणार नाही. शेतकऱ्यांना अनुदान देताना एक हमीपत्र लिहून घेतले जाते. त्यात २० अटीनियम नमूद करण्यात आलेल्या आहे.

त्यातील नियम क्रमांक १५ नुसार शेततळ्यात पडून जीवित हानी टाळण्यासाठी उपाय करण्याची जबाबदारी शेतकऱ्यावर देण्यात आलेली आहे. ‘‘जीवित हानी होऊ नये यासाठी संपूर्ण तळ्याभोवती स्वखर्चाने कुंपण करण्याची जबाबदारी माझी राहील,’’ अशी लेखी हमी घेतली जाते. त्यानंतरच अनुदान दिले जाते. त्यामुळे तळ्यांमधील मृत्यूंबाबत कृषी खात्यावर ठपका ठेवता येणार नाही.

दरम्यान, एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने सांगितले की, कृषी आयुक्तालयाने शेतकऱ्यांसाठी सुरक्षा नियमावली बंधनकारक करायला हवी. गेल्या दहा वर्षांमध्ये तळ्यांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या १०० पेक्षा जास्त दुर्घटना झालेल्या आहेत. त्यामुळे याबाबत तातडीने एक समिती नियुक्त करुन पुढील घटना टाळण्यासाठी काही नियम सक्तीने लागू करणे अपेक्षित होते. परंतु, याविषयाकडे आयुक्तालयाने सतत दुर्लक्ष केले आहे.

मृत्यू रोखण्यासाठी सूचवले हे उपाय

- शेततळ्याची मोका तपासणी करताना सुरक्षा साधनांची तपासणी सक्तीची करावी.

- तळ्याच्या आकारमानानुसार जलतरण तलावांवर वापरल्या जाणाऱ्या ट्यूब, प्लॅस्टिक फ्लोट ठेवावेत. तळ्याच्या चोहोबाजूंनी गाठी मारलेले किमान दहा दोरखंड लावले जावेत.

- प्लॅस्टिक कागदाच्या उतारावर दोरखंडाची चौकोनी जाळी लावावी. तळ्याच्या सर्व दिशांना किमान चार लाइफ जॅकेट कायमस्वरूपी ठेवावीत.

शेततळ्यांमधील मृत्यू किंवा त्याबाबत उपाययोजना करण्याविषयी आमच्या कार्यालयाकडे कोणताही पत्रव्यवहार उपलब्ध नाही. तळ्याभोवती जाळी असावी, असे कृषी खात्याने हमीपत्रात यापूर्वीच सांगितले आहे.
- रवींद्र भोसले, कृषी संचालक, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभाग
शेततळ्यांमधील मृत्यू ही राज्यातील गंभीर समस्या आहे. आम्ही कृषी आयुक्तांची पुन्हा भेट घेणार आहोत. त्याबाबत सर्व खापर शेतकऱ्यांवर फोडता येणार नाही. सुरक्षाविषयक उपाय सूचविणे, ते राबविले की नाही हे तपासणे आणि त्याविषयी जागृती करण्याची जबाबदारी शासनाची आहे.
- संजय रमेश खत्री, माजी अध्यक्ष, ‘सह्याद्री’ गिरीभ्रमण संस्था

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT