PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

PM Modi : सिंचनाच्या सुमारे १०० योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यातील २६ योजना महाराष्ट्रातील होत्या. एवढा मोठा धोका काँग्रेसने राज्याला दिला.

Team Agrowon

Solapur News : काँग्रेसला जनतेने ६० वर्षे राज्य करण्याची संधी दिली. मात्र, काँग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचवू शकली नाही. सिंचनाच्या सुमारे १०० योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यातील २६ योजना महाराष्ट्रातील होत्या. एवढा मोठा धोका काँग्रेसने राज्याला दिला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.३०) माळशिरस येथील जाहीर सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. आता अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकद लावली आहे. आतापर्यंत ६३ योजना पूर्ण केल्या आहेत, असेही मोदी म्हणाले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार बबनराव शिंदे, आमदार शहाजी पाटील, आमदार संजय शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसचे पंतप्रधान आणि नेत्यांकडून आतापर्यंत फक्त गरिबी हटविण्याचा नारा दिला गेला. मात्र, प्रत्यक्षात ती हटविण्यासाठी काहीच केले जात नव्हते. आम्ही गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. या २५ कोटी गरिबीतून बाहेर आलेल्या लोकांचे पुण्य मला नाही, तर ते तुम्हा मतदारांना जाते. तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली. जेव्हा देशात मजबूत सरकार असते, तेव्हा वर्तमान काळाबरोबरच भविष्याकडे लक्ष असते. आज रस्ते, रेल्वे, विमानसेवा, यांसारख्या इतर पायाभूत सुविधांसाठी वेगाने काम होत आहे. काँग्रेस जेवढा निधी दहा वर्षांत खर्च करत होती, तेवढा निधी आम्ही एका वर्षात करतो आहोत, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, की सहकाराचे महत्त्व ओळखूनच स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू केले, पूर्वी ४० कोटी लिटर इथेनॅाल निर्मिती या कारखान्यातून होत होती, आता ती ५०० कोटी लिटरपर्यंत आहे. साखर कारखान्यांचा इन्कमटॅक्सचा प्रश्न या देशाच्या नेतृत्व करणाऱ्या या नेत्याने स्वतःकडे मंत्रिपद असतानाही सोडवला नाही. पण आम्ही तो चुटकीसरशी सोडवला, आज देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापण्याचे नियोजन केले, त्यापैकी आठ हजार कंपन्या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. आज ऑनलाइन मार्केटिंगपासून ते निर्यातीपर्यंत या कंपन्या काम करत आहेत. त्यात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे, असेही ते म्हणाले.

‘आता पवारांना मतदानातून शिक्षा देण्याची वेळ’

‘‘एक मोठा नेता १५ वर्षांपूर्वी माढ्यात निवडणूक लढविण्यासाठी आला होता. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी माढा मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी पोहोचविण्याची शपथ घेतली होती. देशाच्या कृषी विभागाचे त्यांनी नेतृत्व केले. पण काय दिले, या ठिकाणी साधे पाणी त्यांनी पोहोचवले नाही, हे लक्षात ठेवा. त्यांना आता मतदानातून शिक्षा देण्याची वेळ आली आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT