Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : कृषी विभागाचा आपत्कालीन आराखडा तयार

Team Agrowon

Pune News : देशात यंदा १०६ टक्के मॉन्सून बरसण्याचा अंदाज जाहीर केला गेला असला, तरी कृषी विभागाने राज्याचा आपत्कालीन आराखडा तयार ठेवला आहे. मॉन्सून लांबल्यास नेमके काय करायचे याविषयीच्या शिफारशी या आराखड्यात आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मॉन्सून गेल्या वर्षी ११ जून रोजी राज्यात दाखल झाला होता. त्याने २५ जूनपर्यंत राज्य व्यापले होते. परंतु ऑगस्टमध्ये २१ दिवस मॉन्सून बेपत्ता झाला. त्यामुळे खरिपाची मोठी हानी झाली. गेल्या वर्षी मध्येच बेपत्ता झालेला मॉन्सून पुन्हा आला आणि ऑक्टोबरपर्यंत काही भागांत तळ ठोकून होता. विदर्भ व कोकणाचा काही भाग वगळता राज्यातून ९ ऑक्टोबर २०२३ रोजी मॉन्सून परतला होता. या स्थितीचा अभ्यास कृषी खाते व विद्यापीठांनी केला आहे.

कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, ‘आयएमडी’ने यंदा जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षाही जास्त म्हणजे १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परंतु मॉन्सूनच्या लहरीपणाचा फटका यापूर्वी अनेक वेळा राज्याला बसला आहे. पाऊस थोडा लांबला तरी कोरडवाहू भागातील खरीप धोक्यात येते. त्यामुळे कृषी विभागाने मॉन्सूनच्या लहरीपणाबाबत चार शक्यता गृहीत धरीत आराखडा तयार केला आहे.

पाऊस वेळेत सुरू होणे व नंतर अचानक पावसाचा मोठा खंड पडणे, पाऊस उशिरा सुरु होणे, पाऊस लवकर संपणे तसेच चौथी महत्त्वाची शक्यता म्हणजे पाऊस उशिरापर्यंत पडणे व अतिवृष्टी होणे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील एकूण लागवडयोग्य जमिनीपैकी ७५ टक्के भाग जिरायती आहे. या अवर्षणप्रवण भागात दर दहा वर्षांत तीन वर्षे पाऊस उशिरा सुरू होत असल्याचा कल (ट्रेन्ड) आहे. राज्याच्या अवर्षणग्रस्त भागांत जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत खरिपाच्या सर्व पेरण्या अपेक्षित असतात.

परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास केवळ बाजरी, राळा, भुईमूग, तूर, हुलगा हीच पिके घेता येतात. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस लांबल्यानंतर बाजरीदेखील घेता येत नाही. केवळ सूर्यफूल, तूर, हलगा, राळा ही पिके घेता येणार आहेत. विदर्भातील खरिपासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारशी केल्या आहेत. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून दरम्यान विदर्भात नियमित पाऊस सुरू होतो. परंतु, हा पाऊस लांबल्यास आपत्कालीन पीक स्थितीची यंत्रणा तत्पर ठेवावी, असे अकोला विद्यापीठाचे म्हणणे आहे.

...अशा आहेत शिफारशी

मराठवाडा कृषी विद्यापीठाने आपल्या क्षेत्रात १५ जून ते ७ जुलैपर्यंत खरिपाची सर्व पिके पेरावीत, असे सुचविले

आपत्कालीन आराखड्यानुसार, ८ जुलै ते १५ जुलै दरम्यान पाऊस झाल्यास कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ व सूर्यफुलाचा पेरा करता येणार

विदर्भातील खरिपासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशी

विदर्भात नियमित पाऊस दोन-तीन आठवडे उशिरा सुरू झाल्यास शेतकऱ्यांनी लवकर पक्व होणाऱ्या कपाशीच्या वाणांचा पेरा करावा

‘टीएएमएस ३८’ हे सरस वाण वापरावे. सोयाबीन बियाणे हेक्टरी ७५ ते ८० किलो वापरावे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT