Jalgaon News : खानदेशात मागील १५ दिवसांपासून पाऊस नाही. पावसाची ५० टक्क्यांवर तूट जुलैत राहिली आहे. परिणामी, पीकस्थिती बिकट बनली आहे. पिके माना टाकू लागली असून, उत्पादनात मोठी घट येईल, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पीककर्ज व अन्य मार्गाने निधी उभारून शेतकऱ्यांनी खरिपात गुंतवणूक केली. पण ही गुंतवणूक पावसाअभावी वाया जाईल की काय, अशी स्थिती आहे. कारण खानदेशात जूनमध्ये सुमारे १० टक्के पावसाची तूट होती. जुलैत सर्वत्र पावसाची तूट ५० टक्क्यांवर आहे. दुष्काळाचे सावट गडद होत असून, कापूस, मका, सोयाबीन या पिकांसह बागायती पिकांनाही पावसाअभावी मोठा फटका बसत आहे.
पाऊस नसल्याने सर्वच पिकांत किडींची समस्या आहे. ही समस्या रोखतानाच शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. दुसरीकडे पाऊस हुलकावणी देत आहे. अनेक भागांत शेतातून पावसाचे पाणी वाहून गेलेले नाही. जळगावातील यावल, रावेर व अमळनेर तालुक्यांत दुष्काळी स्थिती गंभीर बनत आहे. कारण या तिन्ही तालुक्यांत सुरुवातीपासून पाऊस नाही.
कुठल्याही नद्या, नाले खानदेशात खळाळून वाहत नसल्याची स्थिती आहे. माळरानातील गवतही वाळू लागले आहे. अशीच स्थिती राहिल्यास पुढे पशुधनाची देखील उपासमार होईल. कारण कमाल शेतकऱ्यांकडील कोरडा, साठविलेला चारा संपत आला आहे. चाऱ्यासाठी मका लागवड वाढली. पण मका पीकही पावसाअभावी हवे तसे नाही. पिकांची वाढ खुंटली आहे. केळी निसवणीसह वाढीवर परिणाम झाला आहे. बागायती पिकांत उष्णता, ऊन यामुळे सिंचन करावे लागत आहे.
खानदेशात कापूस पीक साडेसात लाख हेक्टरवर आहे. यात ८० टक्के कापूस पीक कोरडवाहू आहे. हे पूर्ण क्षेत्र आज पाऊस नसल्याने धोक्यात आहे. सोयाबीन, उडीद, मूग पिकात फुलगळदेखील होत आहे.
पाऊस नाही. त्यात ऊन व ढगाळ वातावरण आहे. केळी पिकात करपा रोग दिसत आहे. तर कापूस, उडीद, मूग, सोयाबीन पिकांत रसशोषक किडी आहेत. शेतकऱ्यांना फवारणीदेखील अशा कमी पावसाच्या स्थितीत घ्यावी लागत आहे. पिकांची नुकसान पातळी किडींसह कमी पावसाने वाढत आहे.- महेश महाजन, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल (ता. रावेर, जि. जळगाव)
आपल्याकडे डोंगराळ, मुरमाड क्षेत्रात पिकांना कमी पावसाचा ताण पडू शकतो. पण अन्य भागात मागील महिन्याच्या अखेरीस व या महिन्याच्या सुरुवातीला देखील पाऊस झाला. पाचोरा, भडगाव आदी भागांत पाऊस होता. काळ्या कसदार क्षेत्रात पीकस्थिती बऱ्यापैकी आहे. पण मोठा पाऊस जळगाव जिल्ह्यात झालेला नाही.- कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव
आमच्याकडे अनेक दिवस पाऊस नाही. कांदा लागवडीवर पुढे परिणाम होईल. मका पिकाची स्थिती चिंताजनक असून, दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिकांचा चारा होईल. १०० टक्के हानी होऊ शकते.- नरेंद्र पाटील, शेतकरी, कापडणे (ता. जि. धुळे)
बागायती व खरीप पिकांत पावसाअभावी ४० ते ४५ टक्के नुकसान दिसत आहे. पुढे पाऊस लांबल्यास हानी आणखी वाढेल. नदी, नाले खळाळून वाहत नसल्याने पुढेही जलसंकट राहील. पुढील हंगाम कसा राहील, याचीही चिंता आतापासून सतावू लागली आहे.- दिलीप खडके, शेतकरी, जळगाव बुद्रुक (ता. जळगाव)
आमच्या भागात केळीसह पपई पिकाच्या वाढीसही फटका बसत आहे. कापूस, उडीद, मूग, मका, सोयाबीन पिकांतील उत्पादनात आजघडीला २५ ते ३० टक्के घट दिसत आहे. कारण पावसाअभावी फुलोऱ्यावरील पिकांत अधिकचे नुकसान होत आहे.- अंशुमन पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.