
Nagpur News : पावसाने तब्बल २० ते २२ दिवसांचा खंड दिल्यामुळे सोयाबीन, कपाशीसह सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यासोबतच धानपट्ट्यात रोवणी केलेल्या जमिनीला भेगा पडल्याने रोवणी करपण्याची भीती वर्तविली जात आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेतच ही परिस्थिती उद्भवल्याने त्याचा उत्पादकतेवर देखील परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
पूर्व विदर्भातील धानउत्पादक असलेले सहा जिल्हे हे हमखास पावसाचे म्हणून ओळखले जातात. पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्याचा अपवाद वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांत सरासरी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा उणे सहा पाऊस झाला. त्यासोबतच अमरावती जिल्ह्यात आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा उणे ३१, अकोला उणे २८ तर वाशीम जिल्ह्यात उणे २१ व यवतमाळ जिल्ह्यात उणे १४ टक्के पावसाची नोंद झाली.
विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम हे तीन जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. याचा परिणाम वाढीच्या अवस्थेतील पिकांवर झाला आहे. कपाशी, सोयाबीन या पिकांची वाढ खुंटल्याचे चित्र सर्वदूर असल्याने शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राचे पैदासकार डॉ. सतीश निचळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोयाबीन पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. काही भागातील दोन चार झाडांवर ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशी बाधित झाडे शेतकऱ्यांनी वेळीच काढावी. या व्हायरसचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. काही भागात पांढरी माशी दिसून आली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पाऊस न आल्यास उत्पादकतेवर परिणाम होईल.
ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतचे पर्जन्यमान (मिमी)
नागपूर ३.४
भंडारा ३.८
गोंदिया ५.२
चंद्रपूर २.५
गडचिरोली ८.७
अकोला ०.८
वाशीम २.१
बुलडाणा १.८
यवतमाळ १.६
वर्धा १.३
अमरावती १.५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.