Sowing Update Agrowon
ॲग्रो विशेष

Sowing Update : पेरण्यांची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला; कोरड्या मृगाने चिंता

Monsoon Update In Maharashtra : राज्यात मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडत आहे. त्यामुळे पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडत आहे. त्यामुळे पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

राज्यात अनेक भागांत यंदा वळवाचे पाऊस झालेले नाहीत. तसेच मृगापासून पेरण्या सुरू होतात. मात्र ८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर एक आठवडा उलटला तरीही मॉन्सून फिरकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राज्यात ९ जूनअखेर ३५५ तालुक्यांपैकी २९९ तालुक्यांमध्ये मृग कोरडा गेलेला आहे. त्यामुळे आता सर्व भीस्त आर्दा नक्षत्रावर आहे. २२ जूनपासून आर्दा नक्षत्र सुरू होत आहे. मात्र आर्दात जूनअखेरदेखील हीच स्थिती राहिल्यास कडधान्याच्या पेऱ्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्याचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे म्हणाले, ‘‘२५ ते ३० मिलिमीटर क्षमतेचे कमीत कमी ४-५ पाऊस झाल्यानंतर पेरण्यांसाठी योग्य स्थिती तयार होईल. साधारणतः एकूण १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर ओल पुरेशी खोलवर जाते. त्यामुळे पेरा केल्यानंतर बियाणे उगवण्यास अडचण येत नाही. राज्यभर पुरेसे बियाणे उपलब्ध आहे. मात्र उगवण चाचणी केल्यानंतरच बियाण्यांचा उपयोग करणे गरजेचे आहे.’’

गेल्या वर्षी वळीव व मृगाच्या पावसाच्या जोरावर जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या सुरू झाल्या होत्या. जवळपास साडेचार लाख हेक्टरचा पेरा गेल्या वर्षी ९ जूनपर्यंत झालेला होता. यंदा सरासरी १४२ लाख हेक्टरच्या पुढे खरीप पेरा अपेक्षित आहे. मात्र ९ जूनअखेर पेरा केवळ ७७ हजार हेक्टरपर्यंत झालेला आहे. राज्यात १ जून ते ९ जून या कालावधीत सरासरी ६२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो.

राज्यात यंदा जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत केवळ साडेपाच मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्यामुळे चिंता वाढली आहे. अर्थात, गेल्या वर्षीदेखील याच कालावधीत पाऊस १० मिलिमीटर झालेला होता. मात्र जमेची बाजू अशी होती, की गेल्या खरिपात वळवाच्या पावसामुळे काही भागांत ओल तयार झाली होती व मृगात पेरण्यांना चांगली सुरुवात झालेली होती. यंदाची स्थिती बिकट दिसत आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- मृग नक्षत्र सुरू होऊन एक आठवडा उलटला तरीही पाऊस नाही

- आता सर्व भिस्त आर्द्रा नक्षत्रावर

- कडधान्याच्या पेऱ्यावर प्रतिकूल परिणामाची शक्यता

- यंदाची स्थिती बिकट असल्याचे चित्र

...तर मूग, उडदाला धोका

पाऊस लांबलेला असला तरी मूग, उडीद वगळता बहुतेक भागात जुलैपर्यंत पेरण्या करण्यास संधी उपलब्ध असेल. कपाशीचा पेरादेखील यंदा उशिरा होण्याची शक्यता आहे. मात्र मृगाचा पाऊस वेळेत झाल्यानंतर मूग, उडदाचा पेरा चांगला होतो.

कारण मृग उलटून या दोन्ही पिकांचा पेरा झाल्यास पुढे अतिपावसात मूग, उडदाची पिके सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वाढते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

Lumpy Skin Disease: लम्पी नियंत्रणाची त्रिसूत्री- आहार, स्वच्छता आणि औषधोपचार

Onion Policy : राज्य सरकारला खरोखरच कांदा धोरण ठरवायचे आहे का?

eSakal No 1: 'ई-सकाळ'ची पुनश्च एकदा गगनभरारी ! २१.२ मिलियन वाचकांच्या पंसतीची मोहोर कायम

Soil Testing : नाशिक जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद परीक्षण केंद्रांची होणार उभारणी

SCROLL FOR NEXT